आरोपींना ‘लॉक अप’ वाटते घरासारखे

By Admin | Updated: July 4, 2014 06:46 IST2014-07-04T06:46:34+5:302014-07-04T06:46:34+5:30

गुन्हेगारी थोपविण्यासाठी पोलीस असतात. मात्र, गुन्ह्यातील आरोपींची पोलिसांकडून राखली जाणारी बडदास्त, दोघांमधील जवळीक यामुळे आरोपीलाही ‘लॉकअप’ मध्ये असताना घरात असल्यासारखेच वाटते.

The accused feel 'lock-up' as the house | आरोपींना ‘लॉक अप’ वाटते घरासारखे

आरोपींना ‘लॉक अप’ वाटते घरासारखे

मंगेश पांडे, पिंपरी
गुन्हेगारी थोपविण्यासाठी पोलीस असतात. मात्र, गुन्ह्यातील आरोपींची पोलिसांकडून राखली जाणारी बडदास्त, दोघांमधील जवळीक यामुळे आरोपीलाही ‘लॉकअप’ मध्ये असताना घरात असल्यासारखेच वाटते. पोलिसांनी खाकीशी प्रामाणिक राहून आरोपीला आरोपीसारखी वागणूक दिल्यास गुन्ह्यांचा आलेख कमी होण्यास मदत होईल.
कायदा सर्वांना समान असल्याची शिकवण दिली जाते. कोणत्याही गुन्ह्यातील आरोपी असो, त्याला आरोपीप्रमाणे वागणूक देणे आवश्यक
आहे. पुन्हा गुन्हा करण्याचे आरोपीने धाडस करू नये,
यासाठी पोलिसांकडून त्याला कडक शासन होणेही गरजेचे असते. आरोपीला कडक शिक्षा व्हावी, अशी फिर्यादीची अपेक्षा असते.
आर्थिक हितसंबंधातून पोलीस आरोपीला गुन्हेगाराची वागणूक देण्याऐवजी त्याची बडदास्त राखतात. आरोपीची प्रतिष्ठा जपण्यासाठी बऱ्याचदा त्याला बेड्या ठोकण्याचे धाडसही पोलीस दाखवित नाहीत, त्यामुळे न्यायालयात हजर करताना अथवा इतर वेळी पोलीस आणि आरोपी मित्राप्रमाणेच फिरताना आणि गप्पा मारतानाचे चित्र पहायला मिळते. कायदा सर्वांना समान आहे. अशामुळे खाकीची ताकद कमी होत असल्याने सामान्य नागरिकांनाही आपण असुरक्षित असल्याचे वाटते.
गुन्ह्यातील आरोपीला अटक करून ‘लॉकअप’मध्ये ठेवल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने कोठडीही घेणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील पोलीस ठाण्यात असे चित्र क्वचितच दिसते. याउलट आरोपीची आपुलकीने चौकशी करणे, काही हवे नाही ते पाहणे, यामध्येच पोलीस मश्गुल असतात. आर्थिक हितसंबंधातून हे सर्व होत असताना पोलीस आणि आरोपींची जवळीकही वाढतेच. यामुळे ‘लॉकअप’मधील आरोपी गुन्हा केल्याचे तर विसरतोच शिवाय त्यालाही अगदी घरात असल्याप्रमाणेच वाटते. पोलिसांकडून मिळणाऱ्या अशाप्रकारच्या सन्मानाच्या वागणुकीमुळे आरोपीही मस्तावतात. लॉकअपमधून बाहेर पडताच दुसरा गुन्हा करण्यासाठी छातीठोकपणे तयार होतात. यातून गुन्हेगाराला एकप्रकारे गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहनच मिळते.
आर्थिक हितसंबंधातून निर्माण झालेली दोघांमधील जवळीक समाजात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मारक ठरत आहे. सामान्याला कायद्याचा धाक दाखविणारे पोलीस सराईत गुन्हेगारांशी जवळीक साधून कायदा-सुव्यवस्था कशी राखणार, असाच प्रश्न उपस्थित होतो. पोलीस आणि पोलीस ठाणे म्हटले की, आजही सामान्य नागरिकांच्या अंगावर काटा येतो. असा सामान्य माणूस तक्रार देण्यास ठाण्यात गेल्यावर भेदरलेला असतो. अशावेळी तक्रारदाराला पोलिसांचे सहकार्य आवश्यक असते. आणि आरोपीवर कारवाई करण्याची त्याची अपेक्षा असते. बऱ्याचदा तक्रारदारालाच उलट प्रश्न विचारून पोलीस भंडावून सोडतात. त्यातच आरोपी ‘तगडा’ असेल तर पोलीस तक्रारदाराला आणखीणच कोंडीत पकडतात. पोलिसांच्या या वागणुकीपुढे तक्रारदारही हतबल होतो.
आरोपींवर खाकीचा वचक कमी होत असल्याचे अनेकदा पहायला मिळते. यासाठी पोलिसांची कठोर भूमिका महत्त्वाची आहे. गुन्ह्यातील आरोपींची कसलीही मुलाहिजा न बाळगता त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. पोलिसांनी आरोपीला खाकीचे खरे दर्शन घडविल्यास आरोपीदेखील पुन्हा गुन्हा करण्याचे धाडस करणार नाही.

Web Title: The accused feel 'lock-up' as the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.