रेंगाळलेल्या रुंदीकरणामुळे अपघात
By Admin | Updated: January 18, 2016 01:09 IST2016-01-18T01:09:55+5:302016-01-18T01:09:55+5:30
पुणे-सातारा महामार्गाच्या रुंदीकरण व विकसनाची वाट गेली दोन-तीन वर्षे नागरिक पाहत आहेत. दिवसागणिक शिंदेवाडी ते सारोळा (ता. भोर) दरम्यान पुणे-सातारा

रेंगाळलेल्या रुंदीकरणामुळे अपघात
कापूरव्होळ : पुणे-सातारा महामार्गाच्या रुंदीकरण व विकसनाची वाट गेली दोन-तीन वर्षे नागरिक पाहत आहेत. दिवसागणिक शिंदेवाडी ते सारोळा (ता. भोर) दरम्यान पुणे-सातारा महामार्गावर नवनवीन अपघात वेगवेगळ्या ठिकाणी होऊन यात वाहनचालक प्रवासी व नागरिकांचा बळी जात आहे. कित्येकांना अपंगत्व आले तर काही जबर जखमी झालेले आहेत. यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत आणि याला कारणीभूत आहेत ते अर्धवट रस्ते, असा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी केलेला आहे.
काल मध्यरात्री साताऱ्याहून पुण्याकडे निघालेली मारुती गाडी (एम.एच. ११ ७५७६) रात्री पुण्याकडे जात होती. कामथडी गावच्या हद्दीत कापूरहोळपासून एकसंध तीनपदरी असलेल्या रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. अचानक दोन पदरी झालेल्या ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी दोनपदरी रस्त्याच्या साईडपट्टीला मोठा खड्डा असलेल्या ठिकाणी अपघातग्रस्त झाली. प्रवासी जखमी झाले व गाडीचे मोठे नुकसान झाले. यास कारणीभूत अर्धवट रस्ते व दिशादर्शक न लावल्यामुळे असे अपघात महामार्गावर होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
पुणे-सातारा हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे रात्रंदिवस वाहतूक दळणवळण असते. गाड्यांचा वेगही प्रचंड असतो. मागील आठवड्यात कामथडी येथे रस्ता रुंदीकरणाच्या अर्धवट कामामुळे तीन दुचाकीस्वार अपघातात जबर जखमी झाले होते. लोखंडाची अवजड वाहतूक करणारा कंटेनर याच हद्दीत उलटला होता. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. याचा नाहक त्रास भोवतालच्या नागरिकांना सहन करावा लागत असल्याने महामार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदारांच्या कामाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तसेच वाहतूक पोलीस यंत्रणेकडे स्पीडगन ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशा अवस्थेत असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर महामार्ग पोलिसांनी सांगितली. जेणेकरून या स्पीडगन यंत्रणेमुळे बेलगाम भरधाव दुचाकीस्वारांवर आळा बसेल व भविष्यात असे अपघात टाळता येतील.
पुणे-सातारा महामार्गावर धावणारी वाहने नियंत्रण सुटल्याने पुढच्या वाहनांवर जाऊन आदळणे, रस्त्याच्या कडेला उलटणे, दुभाजक ओलांडून समोरील वाहनांना अपघात होणे या घटनांना कारणीभूत रखडलेले महामार्गाचे रुंदीकरण अशी चर्चा रंगू लागली आहे. (वार्ताहर)