९० हजार धोकादायक वाहने रस्त्यावर
By Admin | Updated: August 24, 2015 03:13 IST2015-08-24T03:13:04+5:302015-08-24T03:13:04+5:30
शहरातील ट्रक, टँकर, ट्रेलर, बस, टुरिस्ट टॅक्सी, आॅटो रिक्षा आदी प्रकारच्या ९० हजार वाहनांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वार्षिक तपासणी

९० हजार धोकादायक वाहने रस्त्यावर
दीपक जाधव, पुणे
शहरातील ट्रक, टँकर, ट्रेलर, बस, टुरिस्ट टॅक्सी, आॅटो रिक्षा आदी प्रकारच्या ९० हजार वाहनांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) वार्षिक तपासणी (पासिंग) करून घेऊन योग्यता प्रमाणपत्र घेतले नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. आरटीओकडून कारवाई होत नसल्याने ही धोकादायक वाहने रस्त्यावर आणण्याचे धाडस वाहनचालक करीत आहेत.
शहरातील वाहनांच्या संख्येने २५ लाखांचा टप्पा ओलांडलेला आहे, त्यामध्ये दुचाकी, चारचाकी या खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सार्वजनिक वाहतुकीचा परवाना घेऊन चालणाऱ्या ट्रक, टँकर, ट्रेलर, बस, टुरिस्ट टॅक्सी, आॅटो रिक्षा या वाहनांची संख्या १ लाख ९० हजार इतकी आहे. त्यापैकी ९० हजार वाहनांनी पासिंगच केले नसल्याची बाब माहिती अधिकारात उजेडात आली आहे. उर्वरित ३१ हजार ८७० वाहनांची नवीन नोंदणी झालेली असून, त्यांना २ वर्षे पासिंगमधून सूट मिळालेली आहे.
याबाबत महाराष्ट्र वाहतूक सेनेचे एकनाथ ढोले यांनी सांगितले, की ‘‘उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता पासिंग करण्यासाठी आरटीओला कोटा सिस्टिम ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे दररोज ठरावीक वाहनांचे पासिंग केली जाऊ शकते. यामुळे पासिंंगसाठी वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात ताटकळत थांबावे लागत असल्याने वाहनचालक पासिंग करण्यासाठी चालढकल करीत आहेत. त्यामुळे वाहनांच्या पासिंगसाठी पुरेशी व्यवस्था आरटीओने उपलब्ध करून द्यावी. पासिंग न करणाऱ्या चालकांविरुद्ध आरटीओने कठोर पावले उचलावीत.’’
पासिंग नसल्याने मिळत नाही नुकसानभरपाई वाहनांचा अपघात झाल्यास त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या
नातेवाइकास व जखमी व्यक्तीस विमा कंपनीने नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. मात्र पासिंग नसलेल्या वाहनांच्या अपघातामध्ये नुकसान वा जीवितहानी झाल्यास कोणत्याही स्वरूपाची नुकसानभरपाई विमा कंपनीकडून दिली जात नाही.
पासिंग न झालेल्या वाहनांच्या तपासणीकरिता आरटीओकडून विशेष पथके नेमण्यात आली आहेत, त्यांच्याकडून या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते, त्याचबरोबर त्या वाहनाचा परवाना रद्द करण्याचेही अधिकार आरटीओला देण्यात आले आहेत. आरटीओकडून पुरेशी कारवाई होत नसल्याने पासिंग न करता रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
वाहनांचा ब्रेक फेल होऊन, टायर फुटणे, इंजिनमधील बिघाडामुळे होणाऱ्या अपघातांची व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत चाललेली आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा परवाना घेतलेल्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. सार्वजनिक वाहतुकीचा परवाना दिलेली वाहने दिवस-रात्र सर्वत्र फिरत असतात. त्यामुळे ही वाहने सुस्थितीत आहेत ना याची आरटीओकडून वार्षिक तपासणी करणे मोटार वाहन कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने त्याबाबत निर्देश दिले आहेत.