कँन्टोन्मेंटमध्ये ७ हजार कुटुंबे सर्वेक्षणाविनाच!
By Admin | Updated: March 28, 2015 01:05 IST2015-03-28T01:05:35+5:302015-03-28T01:05:35+5:30
कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय सर्वेक्षणात ६ हजार ९६० कुटुंबांचे सर्वेक्षण झालेले नाही.

कँन्टोन्मेंटमध्ये ७ हजार कुटुंबे सर्वेक्षणाविनाच!
पुणे : कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय सर्वेक्षणात ६ हजार ९६० कुटुंबांचे सर्वेक्षण झालेले नाही.
तयार केलेल्या यादीबाबत आक्षेप असल्यास, काही बदल करावयाचे असल्यास नागरिकांना अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी १७ एप्रिलपर्यंत मुदत आहे.
बोर्डाच्या हद्दीत सुमारे ६७ हजार ८८१ कुटुंबे आहेत. त्यापैकी ६० हजार ९२१ कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. उर्वरित ६ हजार ९६० कुटुंबांचे सर्वेक्षणच झालेले नाही. २०११ मध्ये केलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय सर्वेक्षणाच्या याद्या नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
बोर्डाच्या कार्यालयीन अधीक्षक चित्रा गोखले यांनी सांगितले, की सर्वेक्षणाच्या याद्या बोर्डाच्या मुख्यालयाबरोबरच सहा शाळांमध्ये ठेवल्या आहेत. वॉर्ड क्रमांक १ आणि २ मधील याद्या जुना मोदीखाना येथील रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळांमध्ये, वॉर्ड क्रमांक ३ आणि ४ मधील याद्या न्यू मोदीखाना येथील महर्षी अण्णासाहेब शिंदे प्राथमिक शाळेत उपलब्ध आहेत. वॉर्ड क्रमांक ५ मधील याद्या सोलापूर बाजारमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूलमध्ये ठेवल्या आहेत. वॉर्ड सहामधील नागरिकांसाठी वानवडी बाजारमधील महादजी शिंदे हायस्कूल आणि वॉर्ड सातमधील नागरिकांसाठी घोरपडी गावातील घोरपडी व्हिलेज हायस्कूल या ठिकाणी याद्या पाहायला मिळणार आहेत. (प्रतिनिधी)
फेरबदलासाठी
करावा लागणार अर्ज
४यादीतील तपशिलाबाबत फेरबदल करावयाचा असल्यास नागरिकांना आक्षेप अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी १७ एप्रिलपर्यंत मुदत आहे. आक्षेप अर्ज ९ मेपर्यंत निकालात काढले जाणार आहेत.
४निकालावर अपील करण्यासाठी ९ मे ते १७ मेपर्यंत मुदत आहे. यादीत समावेश नसलेल्या नागरिकांकडून नवीन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ६ जूनपर्यंत मुदत आहे. ८ जून रोजी यादी अंतिम होणार असल्याचे गोखले यांनी नमूद केले.