अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ५८ हजार जागा रिक्त
By Admin | Updated: July 4, 2014 06:36 IST2014-07-04T06:36:31+5:302014-07-04T06:36:31+5:30
बारावीचा निकाल वाढल्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी शक्यता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यक्त केली जात होती.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ५८ हजार जागा रिक्त
पुणे : बारावीचा निकाल वाढल्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी शक्यता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यक्त केली जात होती. परंतु, गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या तब्बल ५८ हजार जागा रिक्त राहणार आहेत. परिणामी, राज्यातील अनेक महाविद्यालयांना या वर्षीही विद्यार्थी मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढत चालली आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या हजारो जागा रिक्त राहत असल्याने राज्य शासनाने खुल्या प्रवर्गात ४५ टक्के गुण मिळवणाऱ्या आणि मागासवर्गीय प्रवर्गात ४० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, तरीही जागा रिक्त राहत होत्या. परंतु, गुणवत्तेच्या कारणास्तव यंदा प्रवेशासाठी ४५/५० टक्के गुणांची अट लागू करण्यात आली. तसेच, राज्य शासनाने यंदा प्रथमच जेईई परीक्षेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात इयत्ता बारावीचा निकाल वाढला. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता, तर बुधवारी (दि. २) अभियांत्रिकी प्रवेश अर्जाचे किट विक्री करण्याचा अंतिम दिवस होता. बुधवारी १ लाख १२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे किट विकत घेतले, तर गुरुवारी राज्यातील केवळ १ लाख ६ हजार ६०० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश अर्ज भरला. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सर्वसाधारणपणे १ लाख ६५ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे तब्बल ५८ हजार जागा रिक्त राहणार आहेत.
गेल्या वर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या एकूण १ लाख ६२ हजार १५९ जागांवर १ लाख ७ हजार ५४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यामुळे ५४ हजार ६१४ जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा राज्यात सर्वसाधारणपणे १ लाख ६५ हजार जागा उलब्ध असून, त्यात काही प्रमाणात वाढ होऊ शकते. परंतु, उपलब्ध प्रवेश क्षमतेपेक्षाच्या तुलनेत प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही ५८ हजार जागा रिक्त राहणार आहेत. (प्रतिनिधी)