एफआरपीचे ४६० कोटी देणे!
By Admin | Updated: June 18, 2015 23:28 IST2015-06-18T23:28:42+5:302015-06-18T23:28:42+5:30
जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने एफआरपीची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे कारखान्यांकडून ४६० कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.

एफआरपीचे ४६० कोटी देणे!
बारामती : जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने एफआरपीची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे कारखान्यांकडून ४६० कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. त्यावर राज्य सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, २२ जून रोजी राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण यांनी दिली.
बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, ‘‘राज्य व जिल्ह्यातील सर्व खासगी, सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीचा दर दिलेला नाही. राज्यातील कारखान्यांकडे ३ हजार ८२५ कोटी रुपये एफआरपीचे आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांकडे ४६० कोटी एफआरपीची रक्कम थकीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गळीत हंगाम संपून दोन महिने झाले तरीदेखील ही रक्कम मिळत नाही.
त्यामुळे शेती कर्जाचे पुनर्गठण, मुलांचा शैक्षणिक खर्च, शेती खर्च आदी भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या साखर संकुलासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी एफआरपीचा निर्णय मार्गी लावावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे. या वेळी भानुदास शिंदे, नीलेश देवकर, धनंजय महामुलकर, नितीन यादव, पांडुरंग फराटे, अशोक शितोळे, हरीभाऊ नागवडे, महेंद्र तावरे, विठ्ठल देवकाते, कल्पनाताई पुंडे, विलासराव सस्ते, भाऊसाहेब घोडके, डॉ. रवींद्र घाडगे, चंद्रकांत चाबुकस्वार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)