बारावीच्या निकालाचे ४७ टक्के काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:24+5:302021-07-20T04:09:24+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीनंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार ...

बारावीच्या निकालाचे ४७ टक्के काम पूर्ण
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीनंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार केला जात असून गेल्या तीन दिवसांतच निकालाचे ४७ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात पुणे विभाग आघाडीवर असून विभागाचे निकालाचे ५३ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे दहावीपेक्षा बारावीचा निकाल लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बारावीचा निकाल दहावी-अकरावीचे गुण आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर केला जाणार आहे. राज्य शासन व राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाचे काम सुरू केले आहे. दहावीचा निकाल तयार करताना आलेल्या अडचणी बारावीच्या निकालादरम्यान येऊ नये, या उद्देशाने राज्य मंडळाने काळजी घेतली आहे. त्यामुळे निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. येत्या ३१ जुलैपूर्वी बारावीचा निकाल प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार १६ जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाचे काम सुरू केले असून येत्या २३ जुलैपर्यंत राज्य मंडळाकडे अंतर्गत गुण भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. सर्वच विभागातील शाळांनी अंतर्गत गुण भरण्याचे काम सुरू केले असले तरी पुणे जिल्ह्याने त्यात आघाडी घेतली आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून पडणा-या पावसामुळे मुंबईचे काम काहीसे मागे पडले आहे. मात्र, उर्वरित दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांचे काम पूर्ण होईल, असा विश्वास मंडळाच्या अधिका-यांकडून व्यक्त केला जात आहे.
राज्यातील सुमारे ९७ टक्के कनिष्ठ महाविद्यालये शाळांना जोडून आहेत. त्यामुळे या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना बारावीचा निकाल तयार करण्यासाठी फार अडचणी येणार नाहीत. त्यामुळेच पुणे जिल्ह्यातील १५ हजार विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती कनिष्ठ महाविद्यालयांनी सबमिट करण्यात आली असून ४८ हजार विद्यार्थ्यांची माहिती भरून झाली आहे. मात्र, ती समबिट केली नाही. सुमारे ५५ हजार विद्यार्थ्यांचे गुण भरण्याचे काम अपूर्ण आहे, असे सूत्रांनी सांगितले.
----------------------------------------
सर्व कनिष्ठ महाविद्यालयांकडून बारावीचा निकाल तयार करण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांत पुणे विभागाने निकालाचे ५३ टक्के पूर्ण केले. इतर विभागांच्या तुलनेत पुणे विभाग आघाडीवर आहे. दहावीच्या तुलनेत बारावीच्या निकालाचे काम लवकर पूर्ण होईल.
- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ
-----------------
राज्य मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण कनिष्ठ महाविद्यालयांना पाठवले आहेत. तसेच गुण भरण्यासाठी एक्सेल शीट पाठवली आहे. अकरावी व बारावीचे गुण कनिष्ठ महाविद्यालयांकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे निकाल तयार करण्यास गती मिळाली आहे.
-------------------------