७ महिन्यांत ३०६ विद्युत रोहित्रांची चोरी
By Admin | Updated: January 11, 2015 23:59 IST2015-01-11T23:59:21+5:302015-01-11T23:59:21+5:30
प्रामुख्याने शेतीपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने उभारलेल्या रोहित्र संचांपैकी गेल्या ७ महिन्यांत पुणे जिल्ह्यात तब्बल ३०६ रोहित्रांची चोरी झाली

७ महिन्यांत ३०६ विद्युत रोहित्रांची चोरी
प्रज्ञा सिंग-केळकर, पुणे
प्रामुख्याने शेतीपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने उभारलेल्या रोहित्र संचांपैकी गेल्या ७ महिन्यांत पुणे जिल्ह्यात तब्बल ३०६ रोहित्रांची चोरी झाली असून, त्याचा मोठा फटका महावितरणला आर्थिकदृष्ट्या बसला आहेच़ त्याचबरोबरच नवीन रोहित्र बसविण्यास अनेक दिवस वाट पाहावी लागल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसत आहे़
महावितरणच्या पुणे परिमंडळात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांबरोबरच मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यांचा समावेश होतो़ या तालुक्यांमध्ये गेल्या ७ महिन्यांत ८६ रोहित्र चोरीच्या घटना घडल्या़ सर्वाधिक चोरीचे प्रमाण बारामती विभागात आहे़ या विभागात शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि भोर तालुक्यांचा समावेश आहे़ एप्रिल ते डिसेंबर २०१४अखेर २२० रोहित्र चोरीच्या घटना घडल्या आहेत़
गेल्या काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यात रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शहरे किंवा वस्त्यांच्या तुलनेत निर्जनस्थळी असलेल्या शेतांमध्ये रोहित्र चोरीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. या चोऱ्या रोखण्यासाठी लोकांनी, शेतकऱ्यांनी सतर्क राहणे, पाळत ठेवणे आणि चोऱ्या होऊ नयेत म्हणून पुढाकार घेणे गरजेचे आहे.
रोहित्र चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे तसेच महावितरणचे नुकसान होते व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. रोहित्र चोरीस गेल्यानंतर ग्राहकांना मिळणारी वीजसेवा प्रभावित होते. रोहित्र सार्वजनिक ठिकाणी व निर्जनस्थळी असल्याने ते सांभाळण्यासाठी महावितरणकडे स्वतंत्र यंत्रणा नाही. महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी सावध राहून पोलीस यंत्रणा व महावितरणला माहिती दिल्यास रोहित्र चोरी टाळणे शक्य आहे. शेतकरी बांधवांच्या कृषी पंपांना ज्या रोहित्रावरून वीजपुरवठा होतो, ते रोहित्र सांभाळण्याची जबाबदारी शेतकरी ग्राहकांवरच टाकली आहे़
रोहित्र चोरीच्या घटना रोखण्यासाठी महावितरणने अनेक उपाययोजना केल्या आहेत़ रोहित्रांना वेल्ंिडग करून ते वीज खांबांना (डबल पोल) जोडण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांना गस्त घालण्यासाठी महावितरणकडून वाहन व कर्मचारी वेळोवेळी मदतीला देण्यात आलेले आहेत. वारंवार रोहित्र चोरीस जात असल्याने त्या ठिकाणी नवीन रोहित्र बदलून देण्याबाबतचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. चोरीस गेलेले रोहित्र यापुढे बदलून देण्यात येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय होण्याची शक्यता आहे.