किरण शिंदे
पुणे : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार ऍक्शन मोडवर आले आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर मुख्यमनातरी देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा कडक कारवाई कारण्याचे निर्देश दिले आहेत. अशातच पुण्यातून तीन पाकिस्तानी नागरिकांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कोंढवा परिसरात वास्तव्यास असलेले हे तीन जण 'शॉर्ट टर्म व्हिसा'वर भारतात आले होते आणि आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास होते. ही कारवाई पुणे पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर देशातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, संरक्षणविषयक केंद्रीय समितीच्या (CCS) बैठकीत सार्क (SAARC) व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांवर कारवाई करत त्यांना परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाकडून यासंदर्भात अधिक तपशील देण्यात आलेला नाही, मात्र ही कारवाई सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. ही घटना भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सद्यस्थितीतील तणाव आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा भाग असल्याचे बोलले जात आहे.