मलठणला २१ जनावरांचा तडफडून मृत्यू

By Admin | Updated: June 22, 2016 00:55 IST2016-06-22T00:55:00+5:302016-06-22T00:55:00+5:30

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवन फाउंडेशनचा सर्वेसर्वा महेश मोतेवार गजाआड असल्याने त्याच्या विविध प्रकल्पांना घरघर लागली आहे.

21 sticks to death of Manathan | मलठणला २१ जनावरांचा तडफडून मृत्यू

मलठणला २१ जनावरांचा तडफडून मृत्यू

पुणे / राजेगाव : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवन फाउंडेशनचा सर्वेसर्वा महेश मोतेवार गजाआड असल्याने त्याच्या विविध प्रकल्पांना घरघर लागली आहे. दौंड तालुक्यातील मलठण येथील प्रकल्पातील २१ गाई-म्हशीं व त्यांच्या वासरांचा आतापर्यंत चारापाण्याअभावी तडफडून मृत्यू झाला आहे. याबाबत मलठणचे माजी उपसरपंच नवनाथ थोरात यांनी दौंड पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून प्राण्यांना निर्दयपणे वागविण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी : मोतेवार यांनी मलठण (ता. दौंड) येथे २००३मध्ये सुमारे ६० एकरांवर समृद्ध जीवन हा प्रकल्प उभा केला. यामध्ये हजारो गाई-म्हशींचे पालनपोषण सुरू केले. मात्र, ते आता गजाआड असल्याने प्रकल्पातील कामगारांचे पगार आणि चारा पुरविणाऱ्या शेतकऱ्यांची बिले थकत गेली. परिणामी, पगार होत नसल्याने कामगार निघून गेले, तर शेतकऱ्यांनी चारा देणे बंद केले. दोन महिन्यांपासून येथील जनावरांना अनियमित चारा आणि पाणी मिळू लागल्याने जनावरांची मोठ्या प्रमाणात उपासमार झाली व त्यामध्ये शेकडो जनावरे चारापाण्याअभावी तडफडून मरण पावत आहेत. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
अखेर नवनाथ थोरात यांनी दौंड पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दिली. सोमवारी (दि. २०) उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, तहसीलदार उत्तम दिघे, पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी भेट दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे तपास करीत आहेत.
मंगळवारी (दि. २१) दुपारी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. तानाजी खांडेकर आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ़श्रीराम पवार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. याबाबत पवार यांच्याशी संपर्क साधला असता, आमच्या टीमने तेथे जाऊन पाहणी केली असून, प्रथमदर्शनी जनावरांच्या मृत्यूचे कारण उपसमारी दिसून येत आहे. आतापर्यंत एकूण २१ जनावरे दगावली असून, त्यांत २ गाई व १९ म्हैसवर्गीय जनावरांचा समावेश आहे. मात्र, तरीही आम्ही नमुने घेतले असून, आमच्या तेथील अधिकाऱ्यांना लसीकरणाच्या सूचना दिल्या आहेत. (वार्ताहर)

अशीही माणुसकी
समृद्ध प्रकल्पातील व्यवस्थापन व कर्मचारी वर्ग निघून गेल्याने येथील जनावरे बेवारस झाले आहेत. त्यामुळे या जनावरांना पाणी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा परिस्थितीत मलठणचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. राहुल हगारे, खडकी पशुधन विकास अधिकारी डॉ. शांतिलाल आटोळे आणि बोरीबेलचे पशुधन विकास अधिकारी डॉ. परशुराम मुत्तेपोड यांनी गेले दोन दिवस स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या जनावरांचे संगोपन करण्याचा प्रयत्न केला आहे.


काही वर्षांपूर्वी मलठण येथील याच प्रकल्पात एका युवक कामगाराला प्रकल्पाची काही गोपनीय माहिती मिळाल्याची खबर संबंधितांना मिळाली. सदर युवकाला एका खोलीत डाबून त्याच्यावर पिसाळलेले माकड सोडले़ माकडाने युवकाच्या अंगावर चावे घेऊन जखमा केल्या. त्या जखमांवर मीठ व मिरची चोळल्याची युवकाने पत्रकारांना माहिती दिली होती.

समृद्ध जीवन प्रकल्पात हजारो संकरित गाईम्हशी होत्या. त्यांमध्ये आजअखेर संकरित गाई ११९, म्हशी १७६ आणि देशी गाई १७ अशी एकूण ३०९ जनावरे फक्त जिवंत असल्याची माहिती मलठणचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. राहुल हगारे यांनी दिली. त्यामुळे या प्रकल्पातील हजारो जनावरे कोठे गेली की मेली की कोणी नेली, हा प्रश्न समोर आला आहे.

Web Title: 21 sticks to death of Manathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.