महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे सरकार हे लबाड सरकार म्हणून ओळखलं जाणार आहे. राज्यात वीज कनेक्शन तोडण्यावर स्थगितीची घोषणा सरकारनं सभागृहात केली होती आणि आता सरकार त्यासाठी असमर्थ असल्याचं सांगत आहे. राज्याच्या जनतेच्या डोळ्यात सरळसरळ धूळफेक करण्याचं काम ठाकरे सरकारनं केलं आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Thackeray Government lie Government History Maharashtra Says Devendra Fadnavis)
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. "राज्यात महाविकास आघाडी सरकारची केवळ नौटंकी सुरू आहे. घोषणा करायच्या आणि नंतर त्यावर मागे फिरायचं यातून राज्यातील सामान्य जनता व शेतकरी भरडून निघत आहेत", असं फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारनं अधिवेशनातून पळ काढला"राज्याचा विरोधी पक्ष खंबीरपणे आपलं काम करत असून सभागृहात अतिशय महत्वाच्या क्षणी मुख्यमंत्र्यांनी येऊन संबोधित करण्याची गरज होती. पण ते आले नाहीत. या अधिवेशनातून महाविकास आघाडी सरकारनं अक्षरश: पळ काढला", अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
सचिन वाझे प्रकरणी सगळे पुरावे एटीएसला देणार"मनसुख हिरेन प्रकरणी माझ्याकडे सीडीआर कसा आला याची सरकारनं खुशाल माझी चौकशी करावी. मी माझ्याजवळचा सीडीआर एटीएसकडे नक्कीच पाठवणार आहे आणि या प्रकरणाचा पाठपुरावा देखील करणार आहे", असं स्पष्ट शब्दांत फडणवीस यांनी सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंची वकीलसचिन वाझे यांच्याविरोधात इतके गंभीर पुरावे असतानाही त्यांना पदावरुन दूर केलं जात नाही आणि खुद्द राज्याचे मुख्यमंत्री त्यांची बाजू घेत आहेत हे अतिशय आश्चर्यकारक आहे. सचिन वाझेंना वकीलाची गरज नाही कारण मुख्यमंत्रीच त्याची वकीली करतायत, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.