चार आमदारांचे राजीनामे, या राज्यात काँग्रेसचं सरकार अल्पमतात
By बाळकृष्ण परब | Published: February 16, 2021 02:55 PM2021-02-16T14:55:51+5:302021-02-16T15:05:36+5:30
Congress government is in the Minority : आधीच देशातील काही मोजक्याच राज्यांत काँग्रेसची सत्ता राहिली असतानाच आता अजून एका राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार अल्पमतात आलं आहे.
नवी दिल्ली - आधीच देशातील काही मोजक्याच राज्यांत काँग्रेसची सत्ता राहिली असतानाच आता अजून एका राज्यात काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वातील सरकार अल्पमतात आलं आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये (Puducherry) चार आमदारांनी दिलेला राजीनामा आणि एक आमदार अयोग्य घोषित झाल्याने विधानसभेमध्ये काँग्रेस नेते व्ही. नारायणसामी (V. Narayanasamy) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत गमावले आहे. पुदुचेरीमध्ये विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीबाबतच्या रणनीतीची चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) पुदुचेरीमध्ये येणार होते. मात्र त्यांच्या या दौऱ्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी पक्ष सोडल्याचे समोर आले आहे. ( Congress government is in the minority in Puducherry)
एकाच वेळी पाच आमदार गमावल्याने पुदुचेरीमध्ये काँग्रेसला मोठे राजकीय नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच त्यांना बहुमत गमवावे लागले आहे. गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या आमदारांनी एकापाठोपाठ एक असे राजीनामे दिले आहेत. काहींनी ट्विट करून राजीनाम्याची घोषणा केली आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १५ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसची सहकारी असलेल्या डीएमकेने ४ जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता.
दुसरीकडे एनआर काँग्रेसने ७ आणि मित्रपक्ष असलेल्य एआयएडीएमकेने ४ जागांवर विजय मिळवला होता. मात्र नायब राज्यपाल किरण बेदी यांनी भाजपाच्या तीन जणांना मतदानाचा अधिकार दिला होता. त्यामुळे ३० सदस्यीय विधानसभेची सदस्यसंख्या वाढून ३३ झाली होती.
दरम्यान, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी नायब राज्यपाल किरण बेदी यांच्यावर काम करू देत नसल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांच्याकडे किरण बेदींविरोधात पत्र दिले होते. नायब राज्यपालांकडून अधिकाऱ्यांना धमक्या मिळत आहेत. त्यामुळे आम्ही मोकळ्या वातावरणात काम करू शकत नाही आहोत, असा आरोप नारायणसामी यांनी केला होता.