शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

उसका भगवा मेरे भगवे से जादा भगवा कैसा?

By यदू जोशी | Updated: November 21, 2020 11:20 IST

Shiv Sena, BJP, BMC Election News: मुंबईत मराठी टक्का कमी होण्याचं कारण काय? पश्चिम बंगालमध्ये माकपची सत्ता असताना मुखर्जी त्याचं घर बॅनर्जीलाच विकेल हे माकपवाले जातीनं पहायचे, मुंबईत शाखाप्रमुख, आमदार बिल्डरांचे भागिदार झाले अन् वाघाचा चावा कमी झाला.

ठळक मुद्देमुंबई भाजपच्या गळ्यातील चंद्रहार आहे असं  प्रमोद महाजन म्हणायचे. तो चंद्रहार गळ्यात घालण्यासाठी भाजप सगळी ताकद पणाला लावेल.कधी मायावती तर कधी मेहबुबा मुफ्तींबरोबर बसणाऱ्या भाजपच्या हिंदुत्वाची यत्ता कंची हा सवाल शिवसेना करेल.अमराठी लोकांची चाकरी करतो पण या शेठ, भैय्या, दाक्षिणात्यांच्या छाताड्यावर माझा भगवा आहे या अस्मितेला शिवसेना हात घालते आणि जिंकते.

यदु जोशी

मुंगी आणि मुंबई कधीही थांबत नाही असं म्हणतात आणि ते खरेही आहे. ट्वेन्टी फोर बाय सेवन धावणारी मुंबई कोरोनाच्या काळात  मंदावली पण थांबली नाही. थांबणं माहिती नसलेलं हे शहर राज्याच्या राजधानीचं आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं आहे पण राजकीयदृष्ट्या ते कोणाचं याचे पडघम वाजायला आता सुरुवात झाली आहे. ‘उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे?’ अशी एका डिटर्जन्ट पावडरची जाहिरात आहे. त्याच धर्तीवर,‘ उसका भगवा मेरे भगवे से जादा भगवा कैसा’ असा सवाल खडा दोन भगवे पक्ष एकमेकांना करू लागले आहेत.  तीस वर्षे पाटाला पाट लावून बसलेले शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांनी एकमेकांना आव्हान दिलं आहे. मुंबई महापालिकेवर आता भाजपचाच भगवा फडकेल असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर ‘भाजपचा भेसळयुक्त भगवा मुंबईकर फडकू देणार नाहीत’ असं प्रतिआव्हान शिवसेनेने दिलं आहे.

पुढच्या महिन्यात आपल्याकडे विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक होतेय. त्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढताहेत. ती एक अ‍ॅसिड टेस्ट असेल पण नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीला महाविकास आघाडी एकत्रितपणे सामोरे जाईल का ते अधिक महत्त्वाचे असेल.

२०२२ च्या सुरुवातीला मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे आणि नाशिक या महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांचा फड रंगेल. कुठेही भाजप-शिवसेना  एकत्र येतील असं वाटत नाही. मुंबई महापालिकेचं बजेट ३९ हजार कोटी रुपयांचं आहे आणि ती शिवसेनेची जीवनरेखा आहे. कथेमध्ये राजाचा जीव पोपटाच्या कंठात होता तसा शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेत आहे. गेल्या खेपेला दोन पक्षांमध्ये दोनचार जागांचच अंतर होतं. केंद्रात आणि राज्यात दोघे एकत्र होते आणि कुठलीही खळखळ न करता भाजपनं शिवसेनेकडे सत्ता जाऊ दिली होती. यावेळी मात्र शिवसेनेची ही जीवनरेखा तोडण्याचा भाजपचा गेमप्लॅन असेल. मुंबईत मराठी टक्का आता बराच खाली आला आहे. जाणकार सांगतात की गेल्यावेळी तो २७ टक्के होता आणि आता २३ टक्क्यांवर आला आहे. मराठी मतदार शिवसेनेभोवती दरवेळी एकवटत आला आहे. शिवसेनेनं भावनिक साद घालत, कधी मुंबई खतरे में है सांगत, कधी भावनिकतेला हिंदुत्वाची फोडणी देत वरचष्मा टिकवला. मुंबईत सर्वात समस्याग्रस्त मराठी माणूस आहे. तो चाळीत राहतो.

अमराठी लोकांची चाकरी करतो पण या शेठ, भैय्या, दाक्षिणात्यांच्या छाताड्यावर माझा भगवा आहे या अस्मितेला शिवसेना हात घालते आणि जिंकते. अर्थात, शिवसेनाप्रमुखांनी उभी केलेली पक्षसंघटना, शाखांचा लोकांशी असलेला कनेक्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेमुळे मराठी माणूस मुंबईत टिकून आहे हे वर्षानुवर्षे बिंबवण्यात आलेलं यश ही जमेची बाजू आहेच. मुंबईत मराठी टक्का कमी होण्याचं कारण काय? पश्चिम बंगालमध्ये माकपची सत्ता असताना मुखर्जी त्याचं घर बॅनर्जीलाच विकेल हे माकपवाले जातीनं पहायचे, मुंबईत शाखाप्रमुख, आमदार बिल्डरांचे भागिदार झाले अन् वाघाचा चावा कमी झाला.

यावेळची निवडणूक फक्त मराठीच्या मुद्यावर लढून भगवा फडकवता येणार नाही याची कल्पना असल्यानं आदित्य ठाकरे पक्षाचा बेस वाढवण्याचा प्रयत्न करताहेत पण त्यासाठी त्यांना त्यांच्याच वयाचे असलेल्या तेजस्वी यादवांसारखा करिष्मा करून दाखवावा लागेल. दरबारी संस्कृती टाळावी लागेल. हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेची जास्तीतजास्त अडचण मुंबई आणि औरंगाबादमध्ये करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. उद्या मुंबईत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी झाली तर शिवसेनेचं हिंदुत्व भाजपकडून संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलं जाईल. भगव्याचा रंग शिवसेनेनं फिका केल्याची टीका ते करतील.

कधी मायावती तर कधी मेहबुबा मुफ्तींबरोबर बसणाऱ्या भाजपच्या हिंदुत्वाची यत्ता कंची हा सवाल शिवसेना करेल. दोन भगव्या पक्षांमध्ये घमासान अटळ आहे. मुंबईची लढाई ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची असेल. तिथे ते सत्ता टिकवू शकले तर पुढची दहा वर्ष त्यांना मागे वळून पाहावं लागणार नाही. शिवसेना-काँग्रेस हे दोन परंपरागत प्रतिस्पर्धी एकत्र अन् शिवसेना-भाजप हे परंपरागत मित्र एकमेकांच्या विरोधात अशी लढाई रंजक राहील. गेल्यावेळी राज्यातील सत्तेचं बळ मुख्यत्वे भाजपच्या पाठीशी होतं यावेळी ते शिवसेनेच्या पाठीशी असेल. शिवाय उद्धव ठाकरेंसोबत शरद पवार राहिले तर ताकद आणखीच वाढेल. मुंबईत अनेक वर्षे भाजप हा शिवसेनेच्या आडोशाने राहिला अन् नंतर शिवसेना व काँग्रेस या दोन्हींच्या व्होट बँकेत घुसून त्यांनी स्वत:ची जागा तयार केली. घाटकोपर, मालाड मुलुंड बोरीवली कांदिवली मुंबादेवी, काळबादेवीच्या पलिकडे त्याचा विस्तार केव्हाच झाला. मुंबई भाजपच्या गळ्यातील चंद्रहार आहे असं  प्रमोद महाजन म्हणायचे. तो चंद्रहार गळ्यात घालण्यासाठी भाजप सगळी ताकद पणाला लावेल.

या सगळ्यात कळीचा मुद्दा असेल तो मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काय करतील? मनसेकडे तेवढं नेटवर्क नाही पण मॅग्नेट असलेला नेता आहे. कृष्णकुंजवरची सध्याची गर्दी तेच सांगत आहे. ते सत्तेबाहेरची सत्ता आहेत. भाजपनं राज यांना डोळा मारला अन् त्यांनी प्रतिसाद दिला तर चित्र वेगळं असेल.  आता दोघंही नकार देताहेत पण निवडणूक जवळ येईल तसं नवीन समीकरण दिसू शकेल. मुंबईची सत्ता मातोश्रीवर की दादरच्या भाजप कार्यालयात याचा फैसला दोघांच्या मध्ये असलेल्या कृष्णकुंजवर बराचसा अवलंबून असेल. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरेElectionनिवडणूक