कुणी घर देतंय का घर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2016 01:07 IST2016-03-08T01:07:13+5:302016-03-08T01:07:13+5:30
लासुर्णे (ता. इंदापूर) ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांची नावे २००२ च्या दारिद्र्यरेषेच्या सर्वेक्षणात आली खरी, परंतु यांना घर बांधण्यासाठी जागा नसल्याने आजपर्यंत

कुणी घर देतंय का घर?
लासुर्णे : लासुर्णे (ता. इंदापूर) ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांची नावे २००२ च्या दारिद्र्यरेषेच्या सर्वेक्षणात आली खरी, परंतु यांना घर बांधण्यासाठी जागा नसल्याने आजपर्यंत या लोकांना स्वत:चे घर मिळाले नाही. गेल्या वर्षी शासनाकडून पंचायत समितीला भूमिहीन लोकांना घरकुल बांधणीच्या जागा खरेदीसाठी ५० हजार रुपये देण्यात आले आहेत. परंतु, यासाठी नागरिक, ग्रामसेवक व बीडीओ यांच्याकडे गेले असता त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत.
त्यामुळे या कुटुंबांना ‘कोणी घर देता का घर’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना कायमस्वरूपी निवारा मिळावा, या उद्देशाने केंद्र शासनामार्फत सन १९९६ पासून बेघर व्यक्तींना इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आली.
या योजनेंतर्गत लासुर्ण्यातील १५ ते २० कुटुंबांची नावे या दारिद्र्यरेषेच्या यादीत घरकुल योजनेसाठी मंजूर झाली. परंतु, या लोकांना घर बांधण्यासाठी जागा नसल्याने त्यांना या योजनेचा
लाभ मिळाला नाही. यासाठी शासनाने पंचायत समितीला अशा भूमिहीन लोकांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपये देण्यात आले आहेत.
आजच्या जमिनीच्या वाढत्या दरामुळे ५० हजारांत खासगी मालकाची जागा मिळू शकत नाही. जागा न मिळाल्याने हे नागरिक कायमचे बेघर राहणार आहेत. तर, दुसरीकडे याच गावात गायरान व गावठाण आणि शेतीमहामंडळ व वनविभागाची शेकडो एकर पडीक जमीन आहे.
त्यावर दिवसेंदिवस गावपुढाऱ्यांचे वाढते अतिक्रमण होत असतानाही या बेघर लोकांना घर बांधण्यासाठी ती जागा शासन का देत नाही, अशी विनंती धोंडिराम भडंगे यांनी केली आहे.
भूमिहीन कुटुंबाची मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी अवहेलना करू नये. त्यांना ५० हजार रुपये देण्यापेक्षा याच गावातील गायरान गावठाण अथवा शेतीमहामंडळाची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन वाकसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
(वार्ताहर)