पाण्याचा पुनर्वापर, बचतीची आवश्यकता
By Admin | Updated: July 14, 2014 04:39 IST2014-07-14T04:39:33+5:302014-07-14T04:39:33+5:30
एकेकाळी पाण्यासाठी समृद्ध शहर असलेल्या पुण्यावर एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची नामुष्की ओढविली आहे.

पाण्याचा पुनर्वापर, बचतीची आवश्यकता
पुणे : एकेकाळी पाण्यासाठी समृद्ध शहर असलेल्या पुण्यावर एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची नामुष्की ओढविली आहे. धरणांतील पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सढळ हाताने पाणी वापरण्याची सवय आता सोडण्याची गरज आहे. पुण्यातील काही सोसायट्यांनी पाण्याच्या बचतीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे, यातून पुणेकरांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. पाण्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढे येण्याची हीच वेळ आहे. पुण्यातील काही सोसायट्यांनी पाण्याच्या पुनर्वापराचे प्रकल्प उभारले आहेत. सांडपाण्याचा यातून पुरेपूर वापर होत आहे, यामुळे पाणीपट्टीत सवलत तर मिळणार आहेच, त्याचबरोबर पाण्याची बचतही होणार आहे.
साधारण दर तीन वर्षांनंतर पुण्यावर पाणी कपातीची आपत्ती ओढवते. या वेळी पाणी बचतीबाबत चर्चा होते. विविध उपाय सुचविले जातात. मात्र, पाऊस सुरू झाला, की सगळे मनसुबे वाहून जातात. आता मात्र आपण धडा घेण्याची वेळ आली आहे. पुणे वाढतंय, लोकसंख्या वाढतीय. मात्र, पुण्यासाठीची पाणीसाठवण क्षमता मात्र वाढणार नाही. उपलब्ध पाणीच आपल्याला पुरवून वापरावे लागणार आहे, त्यामुळे आतापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. महापालिकेकडून उपाययोजना होतील म्हणून गप्प बसून चालणार नाही. वैयक्तिक पातळीवरही आपण पाणीबचतीसाठी काळजी घ्यायला हवी.