पाण्यासाठी दिघीकरांचा टाहो...
By Admin | Updated: May 5, 2017 02:40 IST2017-05-05T02:40:47+5:302017-05-05T02:40:47+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यातून शहरवासीयांची पावसाळ्यापर्यंत तहान भागविली जावी, यासाठी

पाण्यासाठी दिघीकरांचा टाहो...
दिघी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यातून शहरवासीयांची पावसाळ्यापर्यंत तहान भागविली जावी, यासाठी महापालिकेने पाणीकपातीचे धोरण अवलंबून दिवसाआड पाणीपुरवठा सुरूकेला आहे. मात्र, पाणीपुरवठा करण्याच्या अनियमित वेळा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, तसेच काही भागात होत असलेला दुर्र्गंधीयुक्त व घाण पाण्याच्या पुरवठ्याने पाणीकपातीच्या पहिल्याच दिवशी दिघीकरांची धावपळ उडाली असून, तहान भागविण्यासाठी नागरिक टाहो फोडत असल्याचे चित्र दिसत आहे.
परिसरातील शिवनगरी कॉलनी क्रमांक १,२,३ मध्ये संध्याकाळी पाणी सोडण्यात आले. दुसऱ्या दिवशी कपातीमुळे पाणी येणार नाही म्हणून नागरिकांनी घरातील छोटी भांडी साठवणीसाठी काढली. मात्र पाण्याची करंगळीपेक्षाही कमी येणारी धार पाहूनच स्थानिकांच्या तोंडचे पाणी पळाले. तासाभरात भरणाऱ्या टाक्या दोन तास पाणीपुरवठा होऊनसुद्धा कोरड्याच राहिल्या. त्यामुळे दोन दिवस काढायचे तरी कसे या जलसंकटात दिघीकर सापडले आहेत. समान दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. विजयनगर कॉलनी क्रमांक ६ मध्ये तर भीषण परिस्थिती आहे. तीन महिन्यांपासून रहिवाशांना दूषित, दुर्गंधीयुक्त पाण्याच्या पुरवठा होत आहे. पाण्याला उग्र वास येत असून, या पाण्यामुळे आंघोळ केल्यानंतर खाज सुटणे, पोटदुखी, लहान मुलांना ताप-उलट्यांचा त्रास होत असून, कित्येकांना दवाखान्याची पायरी चढून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
नळामधून येणारे काळेशार, दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांनी बाटलीत साठवून प्रभागातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष दाखवले. तरीसुद्धा ढिम्म प्रशासनाने कुचकामी कारवाईचा बाऊ करीत समस्या जैसे थे आहे. पाणीपुरवठा विभागातील कर्मचारीसुद्धा असभ्य वागणूक देत, नळजोड कापून टाकायच्या धमक्या देत असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. परिसरातील पाण्याचे व्हॉल्व्ह उघडण्याचे अवजारे बनवून काही घातकी मंडळी पाणी पळवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
गजाननमहाराजनगरातसुद्धा परिस्थिती वेगळी नाही. येथेही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. पूर्वी महापालिकेने परिसरात दिलेल्या कूपनलिका सध्या बंद आहेत. हातपंप सुरू असते, तर निदान घरात लागणाऱ्या इतर कामासाठी पाण्याचा वापर केला गेला असता. पिण्यासाठी सुद्धा पाणी योग्य असल्याने तहानही भागली असती. मात्र सद्य:स्थितीत पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने घशाला कोरड पडली असल्याचे स्थानिक सांगतात.
प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी याबद्दल अवाक्षर काढत नसून पाणी समस्येबद्दल मोबाइलवरून केलेल्या मेसेजला उत्तर दिले जात नाही.(वार्ताहर)
एका दिवसाआड पाण्याने उडविली झोप
जाधववाडी : पाणी नसेल तर काय होईल, याची कल्पनाच करवत नाही याचाच प्रत्यय जाधववाडीत पाहायला मिळाला. एरवी पाण्याबाबत बिनधास्त असणाऱ्या जाधववाडीकरांची एका दिवसाआड पाणीपुरवठ्याने चांगलीच झोप उडाली आहे. जाधववाडीत काही ठिकाणी पहाटे पाच वाजता पाणी येत असल्याने अनेक नागरिक लवकर उठून पाणीसाठा करत आहेत. आपल्या घरातील अधिकाधिक भांडी भरून ठेवण्यास पसंती देत आहेत.
यासह शेजारीच असलेल्या कुदळवाडीतून पाणी साठविण्याकरिता बॅरल्स आणण्यात येत आहेत. काही ठिकाणी दुपारी पाणी येत असून त्याठिकाणी पिण्याचे पाणी मिळविण्याकरिता धडपडत असताना पाहायला मिळाले. परिसरातील छोट्या मोठ्या व्यासायिकांचीही पाणी साठविण्याकरिता एक दिवस आधीच लगबग पाहायला मिळाली.
पाणी वितरणात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी
दिघी : साई पार्क गावठाणातील मंदिराशेजारील काही कुटुंबे, या सर्वांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तर काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने हा पाण्याबाबत दुजाभाव होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
आदर्शनगरमधील ज्ञानदीप बालगृहातील मुलांना या पाणीकपातीचा सर्वांत मोठा फटका बसला असल्याचे दिसून आले आहे. पाण्याचा दाब कमी असल्याने पुरेसे पाणी मिळाले नाही.
बालगृहात असणारे ५५ अनाथ मुले, कर्मचारी यांना दिवसाला नऊ हजार लिटर पाणी लागते. दर दिवशी पाण्याचा टॅँकर परवडत नसल्याने मुले आंघोळीविनाच राहून पिण्यासाठी दोन दिवस पाणी वापरत असल्याचे बालगृहाच्या अधीक्षकांनी सांगितले.