पिंपरी : मावळातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील साकव पुलावर गर्दी झाली आणि वजन न पेलवल्याने पूल कोसळला आहे. दुर्घटनेआधीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यातून गर्दीमुळेच अपघात झाल्याचे दिसून येत आहे.
कुंडमळा परिसरात संरक्षण विभागाचा मिसाईल प्रकल्प असून, संरक्षण विभागानेच पहिल्यांदा शेलारवाडीकडून इंदोरीकडे जाण्यासाठी लोखंडी साकव पूल बांधला होता. पुलाची लांबी शंभर मीटर आहे. त्यासाठी शेलारवाडीच्या बाजूने सात, तर दुसऱ्या बाजूने दोन सिमेंटचे खांब होते. त्यावरून लोखंडी खांब टाकून पूल जोडला होता. पावसाळा सुरू झाला की याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक वर्षाविहारासाठी येत असतात. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत प्रशासनाकडून शोध घेण्याचे काम सुरू होते. मात्र, कारण समजले नव्हते.
या पुलावरून रांजणखळगे आणि बंधाऱ्यावरून पडणारे पाणी पाहता येते. त्यामुळे पावसाळ्यात या पुलावर गर्दी जमते. रविवारीही पुलाच्या दोन्ही बाजूंनी मोठी गर्दी झाली होती. पर्यटकांबरोबरच दुचाकी वाहने उभी केली होती. त्यामुळे वजन न पेलवल्याने पूल तुटला आणि सांगाडा पाण्यात कोसळल्याचे दिसून येत आहे. साकव वाकतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून अपघाताचे कारण पुढे आले आहे. मात्र, या छायाचित्राबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.