शासनाच्या सहकार्याने सोहळा करणार यशस्वी
By Admin | Updated: June 26, 2016 04:44 IST2016-06-26T04:44:13+5:302016-06-26T04:44:13+5:30
जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी सोमवारी (दि. २७ ) प्रस्थान होत आहे. ३३१व्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, श्री संत तुकाराममहाराज

शासनाच्या सहकार्याने सोहळा करणार यशस्वी
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी सोमवारी (दि. २७ ) प्रस्थान होत आहे. ३३१व्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, श्री संत तुकाराममहाराज संस्थान शासनाच्या विविध विभागांच्या सहकार्याने सोहळा यशस्वी करणार असल्याचा विश्वास पालखी सोहळाप्रमुख सुनील दामोदर मोरे यांनी व्यक्त केला.
पालखी सोहळ्याची पूर्वतयारी कशी होते?
पालखी सोहळ्याची तयारी मार्च महिन्यातील तुकाराम बीजोत्सवापासून होते. तुकाराम बीजेच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळ्यात सहभागी दिंड्यांचे चालक व मालकांसमवेत सभा होते. दिंडी व फडकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन, त्यावर तोडगा काढून निर्णय घेतले जातात. शासनाच्या विविध विभागांशी, जिल्हा परिषद, पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेशी पत्रव्यवहार करून सोहळ्यासाठी आवश्यक बाबींची कल्पना दिली जाते. सोहळ्यापूर्वीच पालखीचा कार्यक्रम निश्चित करून मुक्काम तिथीनुसार ठरविले जातात. मंदिराची रंगरंगोटी, साफसफाईचे कामही पूर्ण झाले आहे.
सोहळ्याच्या कार्यक्रमात विशेष बदल आहेत का?
या वर्षी कोणतीही तिथी दोन वेळा नसून, एकाही तिथीचा क्षयही नसल्याने पालखीचे मुक्काम पुणे शहर सोडले, तर कोठेही दोन दिवस नाहीत. त्यामुळे कार्यक्रमात मोठे बदल नाहीत. व्यवस्थापनाकडून प्रसंगानुरूप निर्णय घेतले जातात.
पालखी, रथाची सज्जता कशी केली आहे?
सोहळ्यादरम्यान रथाला कोणतीही समस्या येऊ नये, यासाठी त्याची दुरुस्ती व देखभाल ही खडकी येथील ५१२ वर्कशॉप येथील भाविक कर्मचाऱ्यांच्या मदतीने करून घेतली आहे. रथ. पालखी, चोप, अब्दागिरी, गरुडटक्के, पूजेची ताटे, घागरी, समई, मंदिरातील प्रभावळ, मंदिरातील दाराच्या चौकटी यांना चकाकी दिली आहे.
पालखी तळांची व्यवस्था कशी आहे?
पालखी मार्गाची पाहणी झाली असून, पुणे व सोलापूर हद्दीतील पालखी तळांच्या जागेच्या संदर्भातील अडचणी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या आहेत. स्थानिक प्रशासनाकडून तळाची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अकलूज येथील पालखी तळाची जागा अत्यंत कमी असून, तेथे पालखी मुक्कामी नेणे जिकिरीचे ठरते. येथे पालखी नेत असताना रस्त्यात गर्दी झाली, तर अडचणीला सामोरे जावे लागेल. याबाबत ग्रामस्थ व प्रशासनाशी संवाद साधून, तेथील महाविद्यालय पटांगणात पालखीचा तळ ठेवावा व तेथील स्टेडियममध्ये रिंगण व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहोत. लोणी काळभोर, सणसर येथील तळाचे प्रश्नही तातडीने सुटावेत, अशी अपेक्षा आहे.
पालखी मार्गाची पाहणी संस्थांच्या विश्वस्तांनी केली होती. यामध्ये ठिकठिकाणच्या पालखी तळांवर साफसफाई करण्यात आली नव्हती. इंदापूर येथे पालखी येथील कचरा डेपोपासून जात असते. त्या परिसरात या कचऱ्याच्या वासाचा मोठा त्रास भाविकांना सहन करावा लागतो. यासाठी तेथे पालखी मार्गावर भिंत बांधण्यात यावी, अशी पालिकेकडे मागणी केली आहे. तेथील पदाधिकारी व प्रशासनाने या समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहे.
सुरक्षाविषयक कशी काळजी घेतली जाते?
यात्रा काळात मंदिरातील सुरक्षा महत्त्वाची ठरत असल्याने येथे २८ सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास कार्यान्वित असतात. मंदिराच्या महाद्वारात व दर्शनबारीत धातुशोधक यंत्रे बसविण्यात आली आहेत. याशिवाय दोन पोलीस कायमस्वरूपी व त्यांना मदतीला मंदिराचे रखवालदार काम करत आहेत.
कोणते धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत?
सोहळ्याच्या परंपरेप्रमाणे देहूकरांचा अखंड हरिनाम सोहळाही सुरू झाला आहे. त्याची सांगता प्रस्थानाच्या दिवशी होणार आहे. प्रस्थानाअगोदर पालखीचे मानकरी गिराम, कळंबकर, कांबळे, चव्हाण यांना त्यांची कामे सोपविली जातात. ते नित्यनियमाप्रमाणे करीत असतात.
(वार्ताहर)