स्थानिक आघाड्यांना यश
By Admin | Updated: August 11, 2015 03:46 IST2015-08-11T03:46:13+5:302015-08-11T03:46:13+5:30
मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांच्या तुलनेत विविध गावांत गावपातळीवरील पुढाऱ्यांनी आपापल्या पक्षांच्या सीमा ओलांडत स्थापन केलेल्या आघाड्यांनी

स्थानिक आघाड्यांना यश
- देवराम भेगडे, देहूरोड
मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांच्या तुलनेत विविध गावांत गावपातळीवरील पुढाऱ्यांनी आपापल्या पक्षांच्या सीमा ओलांडत स्थापन केलेल्या आघाड्यांनी जोरदार मुसंडी मारून विजय संपादन केल्याचे चित्र दिसत आहे. या वेळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली असून, यापुढे पैशांशिवाय निवडणूक लढवणे कठीण असल्याची चर्चा गावोगावी आहे.
तालुक्यातील ५१ पैकी तीन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. ४८ ग्रामपंचायतींची ४ आॅगस्टला निवडणूक आणि ६ आॅगस्टला कामशेतवगळता ४७ ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. त्यामध्ये गावपातळीवर स्थानिक नेत्यांनी उघडलेल्या आघाड्या बहुतांश गावात यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरक्षणाने महिलांची संख्या वाढली
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के आरक्षण जाहीर झाल्यावर काही ठिकाणी प्रथमच निवडणूक होत असल्याचा फायदा उठवत गहुंजे, सांगवडेसह बहुतांश ग्रामपंचायतींत महिला राज आले आहे. मात्र या सदस्यांना आपल्या मर्जीने काम करण्यासाठी खऱ्या अर्थाने मोकळीक मिळणार का, असा सवाल जागरूक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
गावागावांत मोठी आर्थिक उलाढाल
यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच मोठी आर्थिक उलाढाल पहावयास मिळाल्याने जुन्या-जाणत्या राजकारण्यांनीदेखील निवडणूक सोपी राहिली नसल्याची कबुली दिली आहे.
या वर्षी प्रथमच मतदारांना एकेका मतासाठी हजार ते दहा हजार रुपये वाटल्याची चर्चा गावागावांत रंगली होती. सुमारे एक हजार मतदार असलेल्या एक छोट्या गावात तर सुरुवातीला मताला पाच हजार ते शेवटी २५ हजार रुपये बाजार फुटला होता. एवढ्यावर थांबले नाही तर काही उमेदवारांनी भावकीतील मते दुसरीकडे जाऊ नये म्हणून भावकीतील जवळचा कारभारी हाताशी धरून त्याच्यामार्फत मोठी रक्कम घराघरांत पोहोचविल्याची चर्चा आहे. बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना आणण्यासाठी आलिशान गाड्यांची व्यवस्था, शिवाय रोख रक्कम देण्यात आली. त्यामुळे निवडणुकीचे आर्थिक गणित चुकले असून, खर्च प्रचंड झाल्याचे दिसून आले.
तालुक्यात विविध राजकीय पक्षांचे झेंडे मिरवणाऱ्या सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गावकी व भावकीच मेळ जमवत अनेक स्थानिक मुद्द्यांवर युत्या व तडजोडी घडवून आणल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या विरोधात असणारे अनेक प्रमुख कार्यकर्ते एकत्र आल्याचे दिसत होते. गुण्यागोविंदाने एकाच पॅनलमध्ये नांदत असल्याचे सार्वत्रिक चित्र
दिसून आले.