पाण्याचा अपव्यय थांबवा

By Admin | Updated: November 2, 2015 00:40 IST2015-11-02T00:40:25+5:302015-11-02T00:40:25+5:30

‘‘दुष्काळ, अवर्षण व पूर अशा नैसर्गिक आपत्तीपासून पुढच्या पिढीला वाचवायचे असेल, तर ऊर्जा व पाण्याची बचत करून पर्यावरणरक्षण केले पाहिजे.

Stop wastage of water | पाण्याचा अपव्यय थांबवा

पाण्याचा अपव्यय थांबवा

पिंपरी : ‘‘दुष्काळ, अवर्षण व पूर अशा नैसर्गिक आपत्तीपासून पुढच्या पिढीला वाचवायचे असेल, तर ऊर्जा व पाण्याची बचत करून पर्यावरणरक्षण केले पाहिजे. विकासाच्या नावाखाली सर्व बाजूंनी पाणी व ऊर्जेचा अपव्यय होत आहे. हे रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी शास्त्र, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी या सर्व क्षेत्रांतील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन व्यवस्थापन राबविले पाहिजे,’’ असे मार्गदर्शन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी केले.
पिंपरीतील डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालय ‘ऊर्जा व्यवस्था व उपयोग’ या विषयावर आंतरराष्ट्रीय शिबिर झाले. त्याअंतर्गत डॉ. राजेंद्र सिंह यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर डी.वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, कुलगुरु पी. एन. राजदान, प्राचार्य डॉ. आर. के. जैन, अधिष्ठाता डॉ. पी. एम. घाणेगावकर, किशोर धारीया आदी उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, ‘‘ २१ व्या शतकाच्या सुरुवातीलाच जमीन, ऊर्जा स्रोत आणि पाण्यासाठी युद्ध होत आहेत. त्याविषयी खूप गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांचे पुर्नभरण झाले पाहिजे आणि मानवनिर्मित त्यातील अडथळे दूर करून पर्यावरणरक्षण
केले पाहिजे. जलसंधारणाच्या नावाखाली काही ठिकाणी मुबलक पाणी वापरले जाते. तर त्याच जिल्ह्यात दुष्काळ पडतो. ’’(प्रतिनिधी)

Web Title: Stop wastage of water