बोलाचीच कढी, बोलाचाच भात
By Admin | Updated: February 5, 2016 01:50 IST2016-02-05T01:50:08+5:302016-02-05T01:50:08+5:30
केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश होऊ शकेल, असा विश्वास भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे

बोलाचीच कढी, बोलाचाच भात
पिंपरी : केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश होऊ शकेल, असा विश्वास भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. हा मुद्दा प्रलंबित ठेवून निवडणुकीत फायदा उठविण्याच्या उद्देशाने ऐनवेळी घोषणा करायची, असा भाजपाचा हेतू असावा, अशी शक्यता काँग्रेसच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.या शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात येथील खासदार, आमदार अपयशी ठरले आहेत. नुसत्याच बढाया मारल्या. बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात याचा प्रत्यय नागरिकांना आला असल्याचे बोलले जात आहे.
स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश होऊ शकेल, असा विश्वास वाटतो. राज्य शासनाने शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश व्हावा, या दृष्टीने प्रयत्न केले. स्वत: मुख्यमंत्र्यांनी याबाबत मागणी केली. केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला. पत्रव्यवहार केला आहे. अद्यापही वेळ गेलेली नाही. पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश होऊ शकेल. या वर्षी नाही तरी पुढील वर्षापर्यंत हा निर्णय होणार यात शंका नाही. १०० टक्के या शहराचा योजनेत समावेश होईल. याबद्दल मनात शंका बाळगण्याचे कारण नाही. - सदाशिव खाडे, माजी शहराध्यक्ष, भाजपा
स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवडचा समावेश होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे येथील खासदार, आमदार यांनी सांगितले. परंतु शहराचा समावेश होऊ शकला नाही, हे त्यांचे अपयश आहे. बोलाचीच कढी, बोलाचाच भात याचा नागरिकांना प्रत्यय आला. अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासह प्राधिकरणाचा प्रश्न, बोपखेल प्रश्न अशा कोणत्याच प्रश्नावर तोडगा काढणे त्यांना शक्य झालेले नाही. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांची काही समीकरणे असतील. त्यामुळे अजूनही ते समावेश होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करीत आहेत.
- सचिन साठे, शहराध्यक्ष, शहर काँग्रेस
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश होईल, अशी अजूनही अपेक्षा आहे. पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरावा केला आहे. शासनस्तरावर प्रयत्न केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने शक्य तेवढे प्रयत्न केले आहेत. अद्यापही पाठपुरावा सुरू आहे. पिंपरी-चिंचवड हे शहर स्मार्ट आहेच; परंतु केंद्राच्या योजनेत समावेश झाल्यास त्यावर खऱ्या अर्थाने शिक्का बसेल. या शहरातील रस्ते, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनि:सारण प्रकल्प व अन्य पायाभूत सुविधांचा विचार करता, हे शहर कोठे कमी नाही. केंद्र शासनाच्या सर्व निकषात पिंपरी-चिंचवड पात्र ठरले. तरीही योजनेत समावेश झाला नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील विकास लक्षात घेता या शहराचा केंद्र शासनाला विचार करावा लागेल. शहर डावलून चालणार नाही. हे शासन स्तरावर लक्षात येईल. त्यामुळे पुढच्या टप्प्यात निश्चितपणे शहराचा समावेश होईल.
- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
स्मार्ट सिटीत शहराचा समावेश होण्याचे नेमके फायदे आणि तोटे स्पष्ट व्हायला पाहिजेत. स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर सामान्य नागरिकांवर कराचा बोजा पडणार नाही, हे शासनाकडून स्पष्ट नाही. केवळ कोट्यवधींचा विकास निधी मिळणार ही अपेक्षा बाळगून स्मार्ट सिटीत सहभाग होणार असेल आणि त्याचा भुर्दंड सामान्यांवर कररूपाने लादला जाणार असेल, तर तोटाच अधिक अशी स्थिती ओढवेल. पिंपरी-चिंचवड हे शहर सर्व निकषात पात्र ठरूनही केंद्राच्या स्मार्ट सिटीत समावेश होऊ शकला नाही, याचे नेमके कोडे उलगडत नाही. यामध्ये संदिग्धता वाटते, म्हणून ही संकल्पना स्पष्ट झाली, तरच पुढचे पाऊल टाकणे उचित ठरणार आहे.
- राहुल कलाटे, शहरप्रमुख, शिवसेना