पिंपरी : युद्धामुळे ‘हाय अलर्ट’ आहे. त्याचे मेसेज सोशल मीडियावर येत आहेत. तसेच मोबाइल फोनवर सातत्याने सायरन वाजत आहे. त्यामुळे आम्हाला आमची ट्रिप अर्धवट सोडावी लागली आहे, अशी आपबिती पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिक दिनेश भानुदास पठारे (वय ३५, रा. पठारे हाऊस, गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी सांगितली.
बांधकाम व्यावसायिक दिनेश पठारे हे पत्नी स्नेहल (वय ३०) आणि मुलगा युवांश (वय १०) यांच्यासोबत खासगी ट्रिपनिमित्त २४ फेब्रुवारी रोजी पुण्यातून दुबई येथे विमानाने गेले. त्याबाबत दिनेश यांनी सांगितले की, त्यांची ट्रिप सोमवारपर्यंत (दि. २) होती. ते अबूधाबी येथे असताना बसचालकाने सांगितले की, इराणसोबत युद्ध सुरू झाले आहे. त्यानंतर अबूधाबी येथे आकाशात काही मिसाइल्स दिसायला लागल्या. तसेच शनिवारी रात्री मोबाइलवर मेसेज आणि सायरन वाजले. त्यामुळे रविवारी दुबई येथे सीईओ हाॅटेलवर परतलो.
दुबई येथेदेखील हाय अलर्ट देण्यात आल्याचे समजले. त्याबाबतचे मेसेज मोबाइलवर आले. मोबाइलमध्ये सायरनही वाजायला लागले. त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. मात्र, रविवारी दुबईत स्थानिक नागरिकांकडून दैनंदिन कामकाज नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे दिसून आले. वडील आणि भावासोबत फोनवरून बोलणे झाले आहे, असे पठारे यांनी सांगितले.
भारतीय नागरिक हाॅटेलमध्ये एकत्र
आम्ही थांबलेल्या हाॅटेलमध्ये इतर देशांचे १० नागरिक तर २५ भारतीय नागरिक आहेत. आम्ही एकमेकांना धीर देत आहोत. तसेच भारतीय दूतावासासोबत सातत्याने संपर्क साधण्यात येत आहे. व्हिसा संपला तरी काळजी करू नका, तो वाढविण्यात येईल. विमानसेवा सुरू झाल्यानंतर सर्वांना पुन्हा सुरक्षितपणे भारतात नेण्यात येईल, असे दूतावासाकडून सांगण्यात आले. त्यामुळे दिलासा मिळाला आहे, असे दिनेश पठारे यांनी सांगितले.
विमानतळावरही भारतीय नागरिक
सुरक्षेच्या कारणास्तव दुबईचे विमानतळ बंद केले. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी भारतात जाणाऱ्या नागरिकांना विमानतळावर थांबावे लागले आहे. त्यांच्याशीही भारतीय दूतावास संपर्क साधत आहे. विमाने रद्द झाल्याने दुबईतील हाॅटेल बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे मी दोन दिवसांचे अजून बुकिंग वाढवले आहे. युद्ध कधी थांबेल किंवा विमानसेवा केव्हा सुरू होईल, याबाबत स्थानिक प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही, असे पठारे यांनी सांगितले.
Web Summary : A Pimpri businessman cut short his Dubai trip due to war fears, high alerts, and constant sirens. He, along with other stranded Indians, are in touch with the Indian embassy for assistance amidst airport closures and uncertainty.
Web Summary : युद्ध के डर, हाई अलर्ट और लगातार बज रहे सायरन के कारण पिंपरी के एक व्यापारी ने अपनी दुबई यात्रा बीच में ही रोक दी। हवाई अड्डे बंद होने और अनिश्चितता के बीच, वह अन्य फंसे हुए भारतीयों के साथ भारतीय दूतावास के संपर्क में हैं।