रेल्वे रूळावर जिवाशी खेळ
By Admin | Updated: June 17, 2016 05:13 IST2016-06-17T05:13:36+5:302016-06-17T05:13:36+5:30
आकुर्डी स्टेशनजवळ लोहमार्ग ओलांडताना बुधवारी रात्री दोन तरूणांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी अपघात घडला. त्या ठिकाणाची पाहणी केली असता, जिवाची पर्वा न करता अनेक प्रवासी

रेल्वे रूळावर जिवाशी खेळ
निगडी : आकुर्डी स्टेशनजवळ लोहमार्ग ओलांडताना बुधवारी रात्री दोन तरूणांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी अपघात घडला. त्या ठिकाणाची पाहणी केली असता, जिवाची पर्वा न करता अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून लोहमार्ग ओलांडत असल्याचे दिसून
आले. त्याकडे रेल्वे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
लोहमार्गावर होणाऱ्या अपघातांच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नसल्याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत दिसून आले. दुपारी चारच्या सुमारास घटनास्थळास भेट दिली असता, लोकलमधून उतरलेले प्रवासी बिनधास्तपणे जीव धोक्यात घालून लोहमार्ग ओलांडताना दिसून आले. लोणावळ्याकडे जाणाऱ्या लोकलमधून उतरलेले प्रवासी पादचारी पुलावरून न जाता लोहमार्ग ओलांडून जात होते. त्यात विद्यार्थी व महिलांचाही समावेश होता. दुसऱ्या विद्यार्थ्याने हा मार्ग घराकडे जाण्यासाठी शॉटकर्ट असल्याने या ठिकाणाहून जात असल्याचे सांगितले. रात्री झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर रेल्वे पोलिसांकडून सुरक्षितेच्या संदर्भात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचे दिसून आले. रेल्वे स्थानकावर एकही रेल्वे पोलीस आढळून आला नाही. लोहमार्ग ओलांडणे कायद्याने गुन्हा असून, अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई तरतूद आहे. असे असतानादेखील पोलिसांकडून कसलीही कारवाई होत नसल्याचे दिसून आहे. (वार्ताहर)
रेल्वेच्या धडकेत दोन तरूणांचा मृत्यू
पिंपरी : लोहमार्ग ओलांडताना रेल्वेने दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. कुलदीप सिंग (वय २१) आणि राज यादव (वय २५, दोघेही रा. सध्या आकुर्डी, मूळ अलाहाबाद, उत्तर प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. कामावरून घरी जाताना ही घटना घडली. हवालदार पुरुषोत्तम कर्दाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ तिरुनेवेली चालुक्य एक्स्प्रेसची दोघा तरुणांना धडक बसल्याची माहिती स्टेशन मास्तरांनी कळविली. त्यानुसार गेलो. लोहमार्गासह परिसराची पाहणी केली. मात्र, दाट अंधारामुळे दोघांचाही शोध लागला नाही. त्यानंतर पहाटे साडेपाचच्या सुमारास पुन्हा त्या परिसरात गेलो. दाट झाडीमध्ये दोन तरुण गंभीर जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती मिळाली. त्यांना तत्काळ हवालदार जे. डी. गर्जे यांच्या मदतीने वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच दोघांना मृत घोषित केले. दरम्यान, आकुर्डी स्टेशनजवळ दोन तरुणांचा अपघात झाल्याची माहिती मिळताच परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्या वेळी सनी यादव नावाची व्यक्ती घटनास्थळी आली. त्याने कुलदीप व राज या दोघांनाही ओळखले. ते सर्वजण गुरुद्वाराजवळ एका भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे त्याने सांगितले. कुलदीप व राज हे रावेतमधील हॉटेलमध्ये कामाला असून, काम संपल्यानंतर रात्री साडेबारापर्यंत घरी येतात. बुधवारी मात्र दोघे घरी आले नाहीत. सर्व मित्रांनी रात्रभर त्यांची वाट बघितली. त्यामुळे पहाटे त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली असल्याचे यादवने सांगितले.