स्वच्छतेत पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट’
By Admin | Updated: February 16, 2016 01:22 IST2016-02-16T01:22:11+5:302016-02-16T01:22:11+5:30
देशातील स्वच्छ शहरांत पिंपरी-चिंचवडचा शहराचा नववा क्रमांक आणि राज्यात पहिला क्रमांक आला आहे. महापालिकेने लोकांच्या सहभागातून राबविलेली स्वच्छता मोहीम

स्वच्छतेत पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट’
पिंपरी : देशातील स्वच्छ शहरांत पिंपरी-चिंचवडचा शहराचा नववा क्रमांक आणि राज्यात पहिला क्रमांक आला आहे. महापालिकेने लोकांच्या सहभागातून राबविलेली स्वच्छता मोहीम, हगणदारीमुक्त शहर, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेविषयी केलेले प्रयत्न यामुळे स्वच्छतेत इतर शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहर आघाडीवर आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, स्वर्गीय राजीव
गांधी प्रशासकीय गतिमानता
अभियान आणि बेस्ट सिटी
अशा गौरवानंतर ‘स्वच्छ शहर’ या सन्मानाने उद्योगनगरीच्या लौकिकात भर पडली आहे.
आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका, औद्योगिकनगरी असा विकासाचा आलेख स्तिमित करणारा आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा नियोजनबद्ध विकास होत असल्याने बेस्ट सिटी, स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे देश पातळीवरील अनेक पुरस्कारांनी शहराचा गौरव केला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या कालखंडात आयुक्त दिलीप बंड यांच्या कालखंडात महापालिकेला राज्याचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आयुक्त आशिष शर्मा आणि महापौर योगेश बहल यांच्या कालखंडात केंद्र सरकारकडून बेस्ट सिटी म्हणूनही शहराचा गौरव झाला होता. भारतीय जनता पक्ष युती सरकारच्या कालखंडात गेल्याच वर्षी आयुक्त राजीव जाधव आणि महापौर शकुंतला धराडे यांच्या कालखंडात राजीव गांधी गतिमानता अभियानाचे पारितोषिक मिळाले होते. तसेच डॉ. श्रीकर परदेशी यांनी राबविलेल्या सारथी प्रणालीचाही गौरव झाला होता. त्यानंतर स्वच्छतेसाठी केंद्र सरकारच्या वतीने केलेल्या पाहणीत पिंपरी-चिंचवड शहराचा देशात नववा क्रमांक लागला आहे.
स्वच्छतेवर भर
राजीव जाधव यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्वच्छतेवर भर दिला आहे. ‘स्वच्छ शहरा’साठी पुढाकार घेतला. शहरातील विविध भागांत असणाऱ्या मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असते. आयुक्तांनी सुरुवातीला शहरातील मोकळे भूखंड स्वच्छ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्वच्छता अभियानात लोकसहभागही घेतला.
जागृती अभियान, लोकसहभाग
शहरात पर्यावरणविषयक जागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले. पर्यावरणजागृतीचे कार्यक्रम घेतले. तसेच विविध सामाजिक संस्थांना या अभियानात जोडले.
कै. नानासाहेब धर्माधिकारी संस्थेच्या माध्यमातून शहरात स्वच्छता अभियान राबविले होते. त्याबरोबर शाळा स्वच्छतेचाही उपक्रम राबविला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ११
हजार स्वच्छतागृहे उभारण्याचे
काम सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापनाचेही विविध प्रयोग सुरू आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या टीमने मागील महिन्यात शहराची पाहणी केली होती. त्या वेळीही शहराच्या विकासाबद्दल समाधान व्यक्त केले होते. (प्रतिनिधी)
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात केंद्र शासनाच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात आले. संपूर्ण देशातून ७५ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला एक हजार ५५९ गुण प्राप्त झाले.
तीन भागांमध्ये गुण देण्यात आले. यामध्ये लोकवस्तीच्या ठिकाणची स्वच्छता, रस्तेस्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृह, रेल्वे स्थानक, गावठाण असलेला भाग, सुनियोजित निवासी वसाहत, कचरा जमा करण्याची पद्धती, कचरा वाहतूक व व्यवस्थापन यासाठी एक हजार गुण होते. तर टोल फ्री क्रमांकावर शहरातील नागरिकांकडून येणारा ‘फीड बॅक’ यासाठी पाचशे गुण होते. उर्वरित पाचशे गुण पथकाकडून करण्यात येणाऱ्या निरीक्षणातून देण्यात येणार होते. या सर्व प्रकारांतून पिंपरी-चिंचवडला दोन हजारांपैकी एक हजार ५५९ गुण प्राप्त झाले आहेत. नागरिकांमध्ये जागृती होण्यासाठी महापालिकेने शहरातील ठिकठिकाणी पथनाट्यांचे आयोजन केले होते. घरोघरचा कचरा गोळा करण्याची पद्धत व त्याचे नियोजन याकडे या अभियानांतर्गत अधिकाधिक लक्ष देण्यात आले होते.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्याची पद्धत चांगली असल्याने त्याचा चांगला फायदा गुण मिळण्यासाठी झाला. यासह शहरातील रस्त्यांच्या स्वच्छतेमुळेदेखील गुणांमध्ये भर पडली आहे. मात्र, ओला व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे प्रमाण कमी असल्याने गुण कमी झाल्याचे बोलले जाते. ओला व सुका कचरा एकत्रितरीत्या जमा करतात.
देशातील १० स्वच्छ शहरांमध्ये शहराचा समावेश झाला. यामुळे या शहराचा प्रथम नागरिक म्हणून मला खूप आनंद झाला आहे. बेस्ट सिटी, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान बक्षिसानंतर मिळालेला हा सन्मान होणे ही बाब आनंदाची आहे.
- शकुंतला धराडे (महापौर)