समस्यांवर मात करणाराच यशस्वी
By Admin | Updated: March 23, 2017 04:24 IST2017-03-23T04:24:18+5:302017-03-23T04:24:18+5:30
शिक्षण ही संधीची गुरुकिल्ली असली, तरी लाखो अभियांत्रिकीचे विद्यार्थी बेरोजगार आहे. कारण ते समस्यांचे मूळ शोधत नाही

समस्यांवर मात करणाराच यशस्वी
निगडी : शिक्षण ही संधीची गुरुकिल्ली असली, तरी लाखो अभियांत्रिकीचे विद्यार्थी बेरोजगार आहे. कारण ते समस्यांचे मूळ शोधत नाही. जो समस्यांचे मूळ शोधून समस्यांवर मात करतो,तोच यशस्वी होतो, असे मत आयसीई आरटीआयएस कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य तांत्रिक अधिकारी मोनिश दर्डा यांनी व्यक्त केले.
येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान संचालित डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट आॅफ मास्टर आॅफ कंप्युटर अॅप्लिकेशन्स आणि एमबीएच्या वतीने आयोजित ‘एचआर मीट’ परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी एंड्युरन्स टेक्नॉलॉजी कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या उपमहाव्यवस्थापक शिवांगी पागे, इटर्न्स सोल्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र टन्ना, डॉ. डी. वाय. पाटील एमबीएच्या संचालिका डॉ. के. निर्मला, अधिष्ठाता डॉ. शलाका पारकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शिक्षणाची प्रक्रिया सुरू ठेवली पाहिजे. आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या नोकरीसाठी तर कराच; पण समाजासाठी देखील आपल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. काही तरी बनण्यासाठी आपल्यात एक प्रेरणास्रोत आहे ते ओळखले पाहिजे. आवडीचे काम करीत राहा व त्या कामाचा आनंद घ्या, असा सल्ला पागे यांनी दिला.
दुपारच्या सत्रात सोप्रा स्टेरियाचे नितीन सोनवलकर, क्रिस्ट टेक्नॉलॉजीच्या निशा नाईक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निज्युर्ली गोगई व मार्क डिसूझा यांनी केले, तर आभार प्रा सपना रामानी यांनी मानले. (वार्ताहर)