पालखी सोहळ्यात तरुणांची संख्या लक्षणीय
By Admin | Updated: June 30, 2016 13:14 IST2016-06-30T01:56:24+5:302016-06-30T13:14:33+5:30
संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्याचे चिंचोलीत शनी मंदिरासमोर पावसाच्या हलक्या सरींनी स्वागत केले.

पालखी सोहळ्यात तरुणांची संख्या लक्षणीय
देहूरोड : संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्याचे चिंचोलीत शनी मंदिरासमोर पावसाच्या हलक्या सरींनी स्वागत केले. मंगळवारी चिंचोलीतील विसाव्याच्या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देहूरोडला कॅन्टोन्मेंटकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. बोर्डाकडून दिंड्यांना पावसाळी घोमते व फराळाचे वाटप करण्यात आले. या वर्षी पालखी सोहळ्यात सहभागी तरुणांची संख्या लक्षणीय आहे.
पादुका व शनी मंदिर परिसरात दुपारी दोनच्या सुमारास पालखीचे आगमन झाले. पालखी येण्यापूर्वी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी थांबले होते. मंदिरासमोर पालखी रथ आल्यानंतर परंपरेप्रमाणे तुकाराममहाराजांची अभंग व आरती म्हटली जाते. मात्र, मंगळवारी दुपारी पालखी रथ मंदिरापासून सुमारे २०० फूट अंतरावर असतानाच अभंग आरती करण्यात आली. त्यामुळे शनैश्वर देवस्थान समितीसह चिंचोली, किन्हई, कान्हेवाडी, किवळे, विकासनगर, रावेत, गहुंजे पंचक्रोशीतील भाविकांनी, तसेच उपस्थित वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पालखी रथ पादुका व शनी मंदिरासमोर आल्यांनतर देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष दत्तात्रय जाधव, धनंजय सावंत, हेमंत सावंत यांच्या हस्ते पुन्हा आरती करण्यात आली. देवस्थानच्या वतीने रमेश जाधव, दत्तात्रय लांडगे, गोविंद भेगडे पालखीवर पुष्पवर्षाव केला. देवस्थान समितीच्या वतीने दिंडी चालकांचा व वीणेकऱ्यांचा उपरणे व श्रीफळ देऊन सत्कार केला. पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर, कामगार नेते लहू शेलार, सुनील हगवणे, संजय पिंजण, बाळासाहेब झंझाड आदी उपस्थित होते. चिंचोली ते देहूरोडदरम्यान पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. मात्र, बहुतांशी वारकऱ्यांनी भिजत आनंदाने नाचत पावसाचे स्वागत केल्याचे दिसत होते. पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधील काही महिला व पुरुषांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणीही फिर्याद दिली नव्हती.
देहूरोड येथे चारच्या सुमारास पालखी दाखल झाल्यांनतर देहूरोड येथे महामार्ग चौकात पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने उपाध्यक्षा अॅड. अरुणा पिंजण, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, सदस्य रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, विशाल खंडेलवाल, ललित बालघरे यांनी पालखीचे स्वागत केले. कार्यालय अधीक्षक श्रीकांत लष्करे, नरेंद्र महाजनी यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी शिक्षक आदी उपस्थित होते.
बोर्डाच्या वतीने दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी पावसाळी घोमते संच व फराळाचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. कॅन्टोन्मेंट रुग्णालयाच्या वतीने सात हजारांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. सात हजारांहून अधिक वारकऱ्यांची मोफत तपासणी करून औषधे देण्यात आली. काही वारकऱ्यांच्या पायांची मालीश करण्यात आली. आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. बोर्डाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिंबक वाकचौरे, डॉ. सामी, डॉ. महेश कुदळे, पी. के. वेळापुरे, तसेच जेएसपीएम फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य हंबर व विद्यार्थ्यांनीही सहकार्य
केले. (वार्ताहर)
आरतीबाबत नाराजी
संत तुकाराममहाराज पालखी रथ चिंचोलीतील पादुका व शनी मंदिरापासून सुमारे २०० फूट लांबवर असतानाच अभंग आरती करण्यात आली. त्यामुळे येथील शनैश्वर देवस्थान समितीसह चिंचोली, किन्हई, देहूरोड व किवळे पंचक्रोशीतील भाविक व वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शनैश्वर देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संत तुकाराममहाराज पालखी सोहळाप्रमुख सुनील दिगंबर मोरे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. भाविकांची शनी मंदिर परिसरात गर्दी उसळली असल्याने, तसेच रथ उभा करण्याबाबत अडचण निर्माण झाल्याने हे घडले असावे. यापुढे मंदिरासमोर आरती करण्याबाबत दक्षता घेण्यात येईल, असे मोरे यांनी सांगितले.