...तर माझी आई वाचली असती!
By Admin | Updated: November 14, 2015 03:06 IST2015-11-14T03:06:23+5:302015-11-14T03:06:23+5:30
‘चार महिन्यांपूर्वी वडिलांनी आईच्या तोंडात कापडी बोळा ठेवून गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. आजी अचानक त्या ठिकाणी आल्यामुळे आईचा जीव वाचला होता

...तर माझी आई वाचली असती!
पिंपरी : ‘चार महिन्यांपूर्वी वडिलांनी आईच्या तोंडात कापडी बोळा ठेवून गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. आजी अचानक त्या ठिकाणी आल्यामुळे आईचा जीव वाचला होता. त्या वेळी पोलिसांकडे तक्रार देण्याचे टाळले. वडिलांनी चार महिन्यांनी तेच केले. अखेर आईचा जीव गेला. वडिलांच्या विरोधात त्याच वेळी पोलिसांकडे तक्रार दिली असती, तर ही वेळ आली नसती,’ अशी भावना
सूरज माने (वय १८) याने व्यक्त केली.
चारित्र्याच्या संशयावरून चाकूने वार करून पत्नीचा खून करून पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी चिंचवड येथील इंदिरानगरमध्ये घडली. खूनप्रकरणी वडील अशोक माने यांच्या विरोधात मुलगा सूरजने फिर्याद दिली आहे.
त्या वेळी सूरज म्हणाला, ‘‘इंदिरानगर झोपडपट्टीत ऐन दिवाळीत रक्ताचा सडा पडला. एकीकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई, दुसरीकडे स्वत:ला जखमी केलेले वडील, वस्तीत वर्दळीच्या ठिकाणी घडलेली घटना, धावत गेलो, पाहून अवसान गळाले, काय करावे सुचेना... कोणी तरी पोलिसांना कळविले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही रुग्णालयात नेले. उपचारापूर्वीच आई नीलाबाईने जीव सोडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चार महिन्यांपूर्वी नातवाईक तसेच जवळच्या लोकांनी वडिलांची समजूत घातली होती. वडिलांच्या वर्तणुकीत सुधारणा होईल, या अपेक्षेने मी पोलिसांकडे तक्रार देण्याचे टाळले होते. आॅगस्टमध्ये वडिलांनी आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी आजी तुकाबाईने दखल घेतल्याने आई बचावली. परंतु, चार महिन्यांनी तेच घडले.’’(प्रतिनिधी)