मध्यावधी निवडणुकीचे पिलू आमचे नव्हेच!

By Admin | Updated: July 27, 2015 03:51 IST2015-07-27T03:51:16+5:302015-07-27T03:51:16+5:30

विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे मान्य केले होते.

Mid-term elections are not ours! | मध्यावधी निवडणुकीचे पिलू आमचे नव्हेच!

मध्यावधी निवडणुकीचे पिलू आमचे नव्हेच!

पिंपरी : विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे मान्य केले होते. मध्यावधी होणार हे पिलू आम्ही सोडलेले नाही. हे सरकार किती दिवस एकत्रितपणे चालवायचे हा सेना-भाजपचा प्रश्न आहे. ते जातीयवादी आणि आम्ही फुले-शाहू-आंबेडकर विचाराचे आहोत. युती ही समविचारी लोकांची होते, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले.
युतीतून शिवसेना बाहेर पडली, तर भाजपाला पाठिंबा देणार का? या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. त्या वेळी पुन्हा निवडणुका परवडणारे नसल्याने महाराष्ट्राच्या भल्यासाठी, विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याचे मान्य केले होते. मात्र, शिवसेनेबरोबर त्यांची युती झाली. मला वाटते, आघाडी ही समविचारी पक्षांची होत असते. त्यांचे आणि आमचे विचार वेगवेगळे आहेत. अच्छे दिनची जादू किती दिवस चालणार यावर युती टिकणार आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. असे जरी असले, तरी हा सर्व खेळ जनता पाहत आहे. मध्यावधीचे आम्ही कोणतेही पिलू सोडलेले नाही.’’
केंद्राकडे पाठपुरावा करणार
विकासकामांत आम्ही राजकारण करीत नाही. सत्तेत असताना सध्याच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचीही कामे केली आहेत, असे सांगून पवार म्हणाले, ‘‘पवनासुधार, मेट्रो, रिंगरोडसाठी पाठपुरावा करणार आहे. मुळा, मुठा, इंद्रायणी नद्यांचे पर्यावरण चांगले राहावे, तसेच पवनासुधारसाठी पर्यावरणमंत्री जावडेकरांना भेटणार आहे.’’
बंद जलवाहिनीबाबत न्यायालय निर्णयाचे पालन व्हावे
पवार म्हणाले, ‘‘पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविताना विरोध झाला. योग्यप्रकारे या योजनेबाबत विचार आणि चर्चा न झाल्याने त्या विरोधात आंदोलन झाले. त्यात शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला. त्याचे निवडणुकीमध्ये राजकारणही केले. या संदर्भात उच्च न्यायालयात दावा सुरू होता. या विषयी न्यायालयाने ज्या सूचना केल्या आहेत. बारापैकी आठ महिने बंदिस्त जलवाहिनीद्वारे आणि उर्वरित चार महिने नदीतून पाणी उचलावे, असा निर्णय दिला आहे. त्याचे पालन व्हावे.’’
मेनन फाशीत राजकारण आणू नये
अतिरेकी कारवायाबाबतचा देशद्रोहाचा गुन्हा सिद्ध झाला असेल आणि याकूब मेननविषयी उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असेल, तर त्याची अंमलबजावणी करायलाच हवी. त्यात कोणतेही राजकारण आणता कामा नये, असेही पवार म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: Mid-term elections are not ours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.