बाजारपेठेत गर्दी, ना गोंगाट!
By Admin | Updated: February 8, 2016 02:03 IST2016-02-08T02:03:18+5:302016-02-08T02:03:18+5:30
शहर आणि परिसरातील भागासाठी पिंपरीतील बाजारपेठ ही मध्यवर्ती असल्याने सुटीच्या दिवशी हमखास गर्दी, असे नेहमीचे चित्र असते

बाजारपेठेत गर्दी, ना गोंगाट!
पिंपरी : शहर आणि परिसरातील भागासाठी पिंपरीतील बाजारपेठ ही मध्यवर्ती असल्याने सुटीच्या दिवशी हमखास गर्दी, असे नेहमीचे चित्र असते. मात्र, रविवारी सुटीच्या दिवशी गर्दी ना गोंगाट अशी परिस्थिती पिंपरी बाजारपेठेत अनुभवास आली. सुटीच्या दिवशी पिंपरी बाजारपेठेत दिवसभर गर्दी असते. सायंकाळी तर तोबा गर्दी उसळते. रविवारी मात्र उलट स्थिती पहावयास मिळाली. दुचाकीस्वारांनी घेतलेली हेल्मेटसक्तीची धास्ती हे त्यामागील कारण आहे.
इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून शगुन चौकाकडे जाताना रविवारी आणि अन्य सार्वजनिक सुटीच्या दिवशी वाहनांची मोठी गर्दी दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने दुचाकींची संख्या अधिक असते. रविवारी पिंपरीत मंडई असो की, कापड बाजारपेठ कोठेही सहज वावर करणे शक्य होत होते. ज्यांच्याकडे हेल्मेट होते. ते दुचाकीवरून संपूर्ण बाजारपेठेत विनाअडथळा सहज फेरफटका मारत होते. दुचाकीवाल्यांना अडवून हेल्मेट नसल्यास शंभर रुपये दंड आकारणी केली जात असल्याने ज्यांच्याकडे हेल्मेट नाही, त्यांनी इच्छा असूनही बाजारपेठेत जाण्याचे टाळले. दोन दिवसांपासून वाहतूक पोलीस हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करीत आहेत. सुमारे दोन हजार वाहनचालकांकडून दंड वसूल केल्याचे वृत्तपत्रात वाचल्यानंतर दुचाकीवर बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. हेल्मेट असेल, तरच बाहेर पडण्याचे धाडस दाखवले जात आहे. महत्त्वाच्या कामानिमित्त पुण्यात अथवा अन्य ठिकाणी जायचे असल्यास अनेकांनी दुचाकीऐवजी पीएमपी बसने प्रवास करण्याचा पर्याय निवडला. ज्यांच्याकडे दुचाकीसह मोटार आहेत, त्यांनी आवर्जून ती बाहेर काढली. रस्त्यावर तसेच बाजारपेठेतही चारचाकी वाहने अधिक संख्येने दिसून आली.
मंडईत ग्राहक आणि हातगाडीवाले यांची गर्दी होत असते. रविवारी मात्र उलट परिस्थिती दिसून आली. अंतर्गत रस्त्यावर मोटारींच्या गर्दीने अडथळे निर्माण झाले. बाजारपेठेत न जाता घराजवळच्या दुकानात खरेदी करण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले. पत्नी व लहान मुले अशा कुटुंबासह दुचाकीवर बाजारपेठेत येणाऱ्यांनी हेल्मेटसक्तीच्या धास्तीने बाजारपेठेत जाणे टाळले. नसती कटकट नको, अनेकजण दुचाकी घेऊन घराबाहेर पडले नाहीत. (प्रतिनिधी)