पावसाने ओढ दिल्याने रोपवाटिका धोक्यात
By Admin | Updated: June 23, 2016 02:00 IST2016-06-23T02:00:00+5:302016-06-23T02:00:00+5:30
पावसाने ओढ दिल्याने मावळ तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरिपाच्या पेरण्या लांबल्या असून, काही शेतकऱ्यांनी लाखो रुपये गुंतवणूक करून सुरू केलेल्या रोपवाटिका (नर्सरी) संकटात आल्या आहेत

पावसाने ओढ दिल्याने रोपवाटिका धोक्यात
पवनानगर : पावसाने ओढ दिल्याने मावळ तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरिपाच्या पेरण्या लांबल्या असून, काही शेतकऱ्यांनी लाखो रुपये गुंतवणूक करून सुरू केलेल्या रोपवाटिका (नर्सरी) संकटात आल्या आहेत.
पाणी नसल्याने या रोपवाटिका सुकण्याच्या मार्गावर आहेत. या रोपवाटिकाधारकांना शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी रोपवाटिकाधारक करत आहेत.
तालुक्यात शेतकऱ्यांनी आपापल्या घराजवळ किंवा शेतात रोपवाटिका उभारल्या आहेत. या रोपवाटिकेतून विविध भाज्यांची रोपे विकली जातात. मात्र पावसाने ओढ दिल्याने या रोपवाटिका सुकायला लागल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
तालुक्यात अशा अनेक गावांत शेतकऱ्यांनी रोपवाटिका उभारल्या आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांना पाणी सहज उपलब्ध होत नसल्याने या रोपांना पाणी कुठून द्यायचे, असा प्रश्न पडला आहे. पावसाने ओढ दिल्याने ओढे, नाले कोरडे पडले आहेत. त्याचा बहुतेक फटका रोपवाटिकावाल्यांना बसत आहे. पाण्याची उपलब्धता आहे, अशा शेतकऱ्यांना रोपवाटिका जगविण्याची चिंता नाही.
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी लोणावळा परिसर वगळता तालुक्यात पावसाने अपेक्षीत हजेरी लावलेली नाही. त्यामुळे भात आणि खरिपातील इतर पिकांची पेरणी लांबली आहे. काही शेतकऱ्यांनी यापूर्वीच भाताची पेरणी केली आहे. मात्र, उगवलेले रोपे जगविण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत
आहे. (वार्ताहर)