कामशेत-पवनानगर रस्त्याची दुरवस्था
By Admin | Updated: July 15, 2016 00:13 IST2016-07-15T00:13:05+5:302016-07-15T00:13:05+5:30
पवनानगर-कामशेत या पवन मावळामधील ४० गावांना जोडणाऱ्या सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

कामशेत-पवनानगर रस्त्याची दुरवस्था
पवनानगर : पवनानगर-कामशेत या पवन मावळामधील ४० गावांना जोडणाऱ्या सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
रस्त्याला साइटपट्टीदेखील नाही. यात या आठवड्यात झालेल्या पावसात या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. प्रवासासाठी दुप्पट वेळ लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक छोटे अपघात होत आहेत. कामगारांना कामावर जायला आणि विद्यार्थ्यांना शाळेत जायला उशीर होतो.
रस्त्याची अवस्था दयनीय होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. या रस्त्याचे खडे ताबडतोब बुजवावे व रस्त्याच्या कडेला पाणी जायला जागा करून रस्त्याला साइडपट्टी कराव्यात, अशी मागणी अॅड. भरत ठाकर प्रतिष्ठानने केली आहे. प्रतिष्ठानचे किसनराव खैरे, संदीप भुतडा, विश्वनाथ जाधव, गणेश ठाकर, शिवाजी सुतार, नवनाथ ठाकर, मनोहर तुपे, संजय केदारी, सचिन ठाकर, बबन कालेकर, संतोष ठुले यांनी केली आहे.
उर्से : पवन मावळातील सोमाटणे-परंदवडी या मुख्य रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. पवन मावळातील दहा-बारा गावांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणून परंदवडी-सोमाटणे हा रस्ता ओळखला जातो. गेल्या दहा वर्षांत या दोन्ही गावांबरोबरच इतर गावांचाही चांगला विकास झाला आहे. गावात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत.
परिसरात अनेक शिक्षण संस्था कार्यरत झाल्या आहेत. यामुळे मुख्य रस्त्यांवरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा चालू असते. मात्र, खराब व खड्डेमय रस्त्यांच्या अवस्थेमुळे वाहनचालकांना याचा खूप त्रास होत आहे. वाहनांचा वेगही खूप मंदावलेला असतो. सध्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. नुकताच उर्से रस्त्याचे काम झाल्याने या रस्त्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र, याला लागूनच हा रस्ता असल्याने हाही रस्ता होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. पण, ती फोल ठरल्याने रस्त्याचे का डांबरीकरण करण्यात आले नाही, असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे. रिक्षाचालकांना तर हे खड्डे डोकेदुखी वाढवत आहे. प्रवाशांनादेखील याचा त्रास सहन होत असल्याने अनेक जण या खासगी वाहनांना टाळत आहेत. (वार्ताहर)