ढोलपथकांचा दणदणाट हवा मर्यादेत
By Admin | Updated: July 27, 2015 03:50 IST2015-07-27T03:50:35+5:302015-07-27T03:50:35+5:30
श हरात ढोलवादन पथकांचा दणदणाट सुरू झाला आहे. गणरायाच्या स्वागत-तयारीसाठी नदीकाठ, मोकळे पटांगण, मैदान आणि शाळेच्या

ढोलपथकांचा दणदणाट हवा मर्यादेत
श हरात ढोलवादन पथकांचा दणदणाट सुरू झाला आहे. गणरायाच्या स्वागत-तयारीसाठी नदीकाठ, मोकळे पटांगण, मैदान आणि शाळेच्या आवारात ढोल-ताशाचे वादन केले जात आहे. दीड ते दोन महिने पूर्वीपासून हा दणदणाट सुरू झाल्याने दररोजच्या कर्कश्श आवाजामुळे रहिवासी वैतागले आहेत. या वादनास बंधन घालण्याची मागणी होऊ लागली आहे. मानधनापेक्षा, नावीन्यपूर्ण तालबद्ध वादन करून नागरिकांची वाहवा मिळविण्यासाठी सरावावर भर दिला जातो. त्यासाठी सर्व सदस्यांना सहभागी करून घेऊन नियमित सराव अत्यावश्यक असल्याचे पथकाचे मत आहे.
शहरात लहान-मोठी अशी शंभरापेक्षा अधिक पथके आहेत. विशेषत: उपनगर आणि ग्रामीण भागांत पूर्वी अशी ढोल-ताशापथके होती. गणेशोत्सवाच्या वाढते पात ढोलपथकांनी नवीन स्थान निर्माण केले आहे. ढोलच्या दणदणाटाशिवाय ‘श्री’ची मिरवणूक ही कल्पनाच कोणी करू शकत नाही. पथकांना महत्त्व आल्याने मंडळाशिवाय अनेक संघ स्थापन झाली आहेत. मंडळात काम न करता केवळ वादनात आवड असलेली मंडळी पथकात समाविष्ट होत आहेत. तसेच, गणेशोत्सवात सहभाग नोंदविण्यासाठी अनेक जण केवळ हौस म्हणून त्यात उतरत आहेत. मंडळातील पदाधिकाऱ्यांशी जमत नसल्याने नाराज कार्यकर्त्यांनी संघ स्थापन केल्याची उदाहरणे आहेत.
त्यात सुशिक्षित आणि युवा वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत असून, महिला वर्गही आकर्षित झाला आहे. पथकांना आकर्षक आणि स्वतंत्र आगळे रूप दिसत आहे. मंडळापेक्षा आपणच कसे वरचढ हे दाखविण्याची स्पर्धा यातून वाढीस लागली आहे. नेतेमंडळी असे संघ स्थापन करण्यास प्रोत्साहत देत आहेत.
मानाच्या गणपतीसमोर अनेक पथके वादन करतात. त्यामुळे पथकांची संख्या वाढते. प्रमुख चौकात वाजविण्यासाठी संघामध्ये चढाओढ असते. यामुळे मिरवणूक संथ होऊन त्याचा कालावधी वाढतो. या संदर्भात पोलिसांनी मर्यादा घातल्या आहेत. मात्र, त्याचे पालन होताना दिसत नाही.
वादनात दर वर्षी नावीन्य आणण्यासाठी संघ प्रयोग करतात. त्यासाठी बराच कालावधी लागतो. सायंकाळी आणि सुटीच्या दिवशी सर्व सदस्य एकत्रित येऊन वादन करतात. प्रत्यक्ष वादनातून ताल मिळतो. त्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वजण वादन करतात, असे संघाचे मत आहे.
आवाजाचा दणदणाट निर्माण होतो. या माध्यमातून भारतीय संस्कृती जपली जात आहे. नवी पिढी यात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. याकडे काणाडोळा करता येणार नाही. वादनाचा दणदणाट हवा असला, तरी तो मर्यादित राखला पाहिजे. नाही तर, गणेशोत्सवाचा मूळ हेतूूच बाजूला सारला जाईल. सरावासाठी परवानगी, पथकाची मर्यादित सदस्य संख्या, मिरवणुकीत एकच पथक, टोलचा वापर नाही, ढोलचा मर्यादित वादन, वेळेचे बंधन, एका ठिकाणी वाजविण्याचा कालावधी असे वेगवेगळे निर्बंध पोलिसांनी घातले आहेत. त्याचे पालन किती होते, हा संशोधनाचा प्रश्न आहे. लोकभावना आणि प्रबोधन झाल्यास यातून निर्माण होणाऱ्या ध्वनिप्रदूषणास स्वयंप्रेरणेतून आळा घालता येईल. ढोलवादनासंदर्भात विरोधी आणि स्वागतार्ह मते असली, तरी बदल स्वीकारत मर्यादित संघांचा वादनाचा आनंद घेतल्यास गणेशोत्सव अधिक सुखकर होईल.
- मिलिंद कांबळे