चिंचवडमध्ये नागरिकांनी अनुभवला थरार
By Admin | Updated: June 20, 2016 00:56 IST2016-06-20T00:56:28+5:302016-06-20T00:56:28+5:30
वेळ दुपारी चारची... चिंचवड स्टेशन, मुंबई-पुणे महामार्गालगतचा पेट्रोल पंपाचा परिसर... टेम्पो घेऊन डिझेल भरण्यास एक तरुण येतो

चिंचवडमध्ये नागरिकांनी अनुभवला थरार
चिंचवड : वेळ दुपारी चारची... चिंचवड स्टेशन, मुंबई-पुणे महामार्गालगतचा पेट्रोल पंपाचा परिसर... टेम्पो घेऊन डिझेल भरण्यास एक तरुण येतो. तो टेम्पोतून खाली उतरतो. तेवढ्यात दुचाक्यांवरून १० ते १२ जणांचे टोळके दाखल होते. तरुणाचा पाठलाग करत आलेल्या टोळक्यातील काहीजण त्या तरुणास बाजूला घेतात. त्यातील काहीजण त्याला खाली पाडून आजूबाजूला पडलेले सिमेंट ब्लॉक उचलून त्याच्या डोक्यात घालतात. पेट्रोल पंपावरील कर्मचारी, तसेच या मार्गाने येणारे-जाणारे हा थरार पाहून थबकतात. सिमेंटच्या ब्लॉकने ठेचून अवघ्या काही मिनिटांत त्या तरुणाला ठार मारून टोळके तेथून पसार होते. पोलीस येतात, पुढील कार्यवाही सुरू होते. चित्रपटात अनेकदा पाहिलेले दृश्य प्रत्यक्षात पाहण्याची वेळ पहिल्यांदाच आल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली.
चिंचवडच्या महावीर चौकातून काही अंतर पुढे आल्यास पिंपरी पोलीस ठाणे आहे. त्यापुढे ५० मीटर अंतरावर पेट्रोलपंप आहे. एमआयडीसी कार्यालय आणि पोस्ट कार्यालयाजवळून येणारा रस्ता पेट्रोलपंपाजवळ जोडला जातो. चिंचवडगाव, पुण्याच्या दिशेने आणि मुंबईकडे जाणारे रस्ते त्या ठिकाणी एकत्रित येतात, असे वाहतूक बेट आहे. पेट्रोलपंपाच्या पुढे बसथांबा आहे. आजूबाजूला दुकाने आणि रिक्षातळ असल्याने नेहमीच या परिसरात वर्दळ असते.
अशा ठिकाणी घडलेल्या खुनाच्या घटनेने शहरवासीय हादरून गेले आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हल्लेखोरांनी ज्याचा जीव घेतला, तो तरुण दत्तनगर झोपडपट्टीत राहणारा आहे. दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयाजवळ त्याचा एकाबरोबर वादविवाद
झाला होता. पूर्ववैमनस्यातून
त्याचा खून झाला, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. (वार्ताहर)कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याच्या खुनाच्या घटनेनंतर ३ सप्टेंबर २०१५ ला नगरसेवक अविनाश टेकावडे यांचा खून झाला. या दोन्ही खून प्रकरणांतील आरोपी दत्तनगर, मोहननगर, तसेच इंद्रायणीनगर परिसरातील होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१५ ला मोहननगरजवळ चेतन मोहिते या तरुणाचा खून झाला. २३ फेब्रुवारीला ताथवडे येथे विकी परमार या युवकाचा खून झाल्याची वाकड पोलिसांकडे नोंद आहे. त्यानंतर २७ जानेवारी २०१६ ला म्हाळुंगेत हाणामारीत एकाचा खून झाला. या घटनेपाठोपाठ निगडी ओटास्कीम येथे मोहसिन शेख या गुंडाच्या खुनाची घटना ७ मार्च २०१६ ला घडली. त्यानंतर ४ एप्रिल २०१६ ला कमल गिरी या व्यक्तीचा वाकड येथे पत्नी प्रिया गिरी हिने खून केल्याचे उघडकीस आले. १२ मे २०१६ ला कासारवाडीत तृतीयपंथीयाने एकाचा खून केल्याचे निष्पन्न झाले.