पिंपरी : महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देत वेगाने पुढे नेणारे, राज्याच्या राजकारणात ठाम निर्णयक्षमता, कार्यतत्परता आणि आपुलकीचा स्पर्श असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आकस्मिक जाणे अजूनही मनाला स्वीकारता येत नाही. दादा आपल्यात नाहीत, ही जाणीवच मावळसह संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध करून टाकणारी आहे, अशा शब्दांत मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भावना व्यक्त केल्या.
आमदार सुनील शेळके म्हणाले, दादांच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी कळताच मनात अक्षरशः धस्स झाले. काही क्षणांतच विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि क्षणातच सगळं बदलून गेलं. हे खरं आहे, हे मान्य करायला मन तयार होत नाही. मावळच्या विकासाला एका उंचीवर नेताना दादांनी माझा हट्ट पुरवताना कधीही आढेवेढे घेतले नाहीत. मी जे जे मागितलं त्यापेक्षा कितीतरी अधिक त्यांनी दिलं. मावळचा विकास हा त्यांच्या मनात कायम होता. आज केवळ मावळच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झालेला आहे. दादा आणि माझे घनिष्ठ संबंध गेल्या सहा-सात वर्षांपासूनचे होते. एकेक प्रसंग आठवला की आजही दादा नजरेसमोर उभे राहतात. जाहीर सभांमधील त्यांचे आश्वासक शब्द, आमदार म्हणून माझे लाड पुरवताना लोकांसमोर मिश्किल पण तितक्याच जिव्हाळ्याने केलेली टिप्पणी, आणि मावळातील जनतेवर असलेले त्यांचे खास प्रेम हे सगळं त्यांनी केवळ शब्दांत नाही तर कृतीतून दाखवून दिलं. मावळासाठी काहीच कमी पडू दिलं नाही. आज मी बारामतीत पोहोचलोय, पण मावळचा विकास आणि दादांचं नसणं, हे सगळंच एकदम अनाकलनीय वाटत आहे. नियतीनं हे काय केलं? सगळं इतकं अचानक, जणू काही क्षणात सगळंच संपल्यासारखं. दुःखाला परिसीमा नसते, हे फक्त ऐकलं होतं. आज ते प्रत्यक्ष अनुभवलं. अजितदादांचं जाणं हे उभ्या महाराष्ट्राला विचार करायला लावणारं, मन सुन्न करणारं दुःख आहे. दादा परत या, परत या असा टाहो मनात सुरू आहे. मी दादांकडे खूप हट्ट करायचो. आता तो हट्ट करायचा कुणाकडे? हा प्रश्न सतत मनाला बोचत आहे. आज दादांचा अखेरचा निरोप घेतानाचा हा क्षण पोरका करणारा आहे. दादांची काही स्वप्नं साकार करण्यासाठी मी जीवाचं रान करीन, त्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करीन. मात्र दादा आता नाहीत, ही खंत, हे दुःख, ही पोकळी कायम मनाला चटका लावत राहील. पवार कुटुंबियांच्या दुःखात सारा मावळ, मी आणि माझा संपूर्ण परिवार सहभागी आहे. असा दादा पुन्हा होणं नाही, मिळणं नाही.