हिंजवडी : मुसळधार पावसाच्या पाण्याखाली हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ते गेल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली. सर्व बाजूंनी नाचक्की झाल्यानंतर येथील प्रशासन कामाला लागले आहे. सोमवारी (दि.९) आयटी पार्क परिसरातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली.
आयटी परिसरात शनिवारी (दि.७) दुपारी चाळीस मिनिटे झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याने, परिसरातील वाहतूक ठप्प होऊन, वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कारभारावर सर्वच बाजूंनी टीकेची झोड उठली होती. त्यानंतर सोमवारी (दि.९) आयटी पार्क परिसरातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी स्थानिक आमदार शंकर मांडेकर तसेच स्थानिक सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, माण रस्ता, गवारे मळा, फेज तीन ते फेज दोन रस्ता ठिकाणाची पाहणी करण्यात आली. पावसाचे पाणी कशामुळे तुंबले, त्याची कारणे काय यावर सविस्तर चर्चा करून, याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार मांडेकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
नैसर्गिक प्रवाह खुले करा
टीका होताच दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सुटी असूनही, एमआयडीसी प्रशासनाने शक्य तेवढे चेंबर, नाले, ओढे साफ केले. सोमवारी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित पाहणी करून समस्या जाणून घेत कामाला सुरुवात केली. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात आयटी पार्कमध्ये भीषण परिस्थिती उद्भवत असते. त्यामुळे तात्पुरती डागडुजी नको, तर कायमस्वरूपी उपाययोजना करा, अशा अपेक्षा आयटियन्स तसेच स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
पीएमआरडीए, एमआयडीसी, पीडब्ल्यूडी, वाहतूक विभाग तसेच स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन पाहणी केली. पुन्हा अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. नैसर्गिक प्रवाह खुले करून घेऊन नियमित साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. - शंकर मांडेकर, आमदार, भोर.