अपसंपदा जमवूनही अभय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:35 IST2017-08-05T03:35:42+5:302017-08-05T03:35:42+5:30
कामगार कल्याण मंडळाच्या अधीक्षक प्रज्ञा म्हात्रे यांनी पाच वर्षांत सुमारे ३२ लाखांहून अधिक अपसंपदा जमविल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नुकताच सादर केला आहे.

अपसंपदा जमवूनही अभय?
पिंपरी : कामगार कल्याण मंडळाच्या अधीक्षक प्रज्ञा म्हात्रे यांनी पाच वर्षांत सुमारे ३२ लाखांहून अधिक अपसंपदा जमविल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नुकताच सादर केला आहे. त्यानंतर कामगार मंडळाच्या प्रशासनाकडून म्हात्रे यांच्यावर पुढील कारवाईचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. परंतु, पारदर्शक कारभाराची घोषणा करणाºया शासनाकडून अपसंपदा जमविलेल्या अधिकाºयांना अभय दिले जात आहे.
पुणे व मुंबईसह राज्यातील विभागीय कार्यालयाकडून विविध खासगी कंपनीत काम करणाºया कामगारांच्या पगारातील काही निधी कपात करून कामगार कल्याण मंडळाकडे जमा होतो. या निधीतून मंडळाच्या प्रशासनाने कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाचे मंडळाकडे दुर्लक्ष होत असल्याने या ठिकाणी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात येत आहेत.
कनिष्ठ लिपिक ते अधीक्षक पदापर्यंत पद्दोन्नती झालेल्या प्रज्ञा म्हात्रे यांनी भ्रष्टाचार करून अपसंपदा गोळा केल्याची तक्रार रमेश पी़ शहा यांनी मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व कामगार राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्याकडे सप्टेंबर २०१० मध्ये केली होती. या तक्रारीची दखल घेत कामगार विभागाने या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.