शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:28 IST

1 / 10
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तनाव टोकाला पोहोचला आहे. या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेत पाच मोठे निर्णय घेतले आहेत.
2 / 10
भारताच्या या निर्णयांत, सिंधू पाणी करार स्थगित करणे, अटारी-वाघा सीमा बंद करणे आणि पाकिस्तानी दूतावासातील लष्करी अधिकाऱ्यांना परत पाठवणे आदींचा समावेश आहे. यानंतर, पाकिस्तानचा अक्षरश: थयथयाट सुरू झाला आहे. पाकिस्ताननेही १९७२ च्या शिमला करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
3 / 10
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९७२ साली शिमला करार झाला होता. या करारातून पाकिस्तानने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. २ जुलै १९७२ रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानच्या झुल्फिकार अली भुट्टो सरकारने शिमला करारावर स्वाक्षरी केली होती.
4 / 10
१९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या दारुण पराभवानंतर शिमला करार झाला होता. याच युद्धात बांगलादेशची निर्मिती झाली होती. या युद्धानंतर हजारो पाकिस्तानी सैनिक आणि ५ हजार चौरस मैल भूभाग भारताच्या ताब्यात आला होता. यावर चर्चा करण्यासाठी भुट्टो शिमला येथे आले होते.
5 / 10
हा करार १९७२ साली हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे झाला होता. या कराराशी संबंधित कागदपत्रांवर इंदिरा गांधी आणि झुल्फिकार अली भुट्टो यांनी २ जुलै रोजी स्वाक्षरी केली. यामुळेच या कराराला शिमला करार, असे म्हटले जाते.
6 / 10
शिमला करारात, दोन्ही देश संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील तत्त्वांचे पालन करतील. संवाद आणि इतर शांततापूर्ण मार्गांने, आपले मतभेद परस्पर सहमतीने सोडवतील, असे मान्य करण्यात आले.
7 / 10
शिमला करारानुसार, भारत आणि पाकिस्तानचे सैनिक आंतरराष्ट्रीय सीमेवर आपापल्या भागांत परततील आणि कुणीही नियंत्रण रेषेवरील स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न करणार नाहीत.
8 / 10
मात्र यानंतर, १९९९ मध्ये पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय हद्दीत प्रवेश करून शिमला कराराचे उल्लंघन केले. यानंतर, भारताने ऑपरेशन सुरू केले आणि पाकिस्तानी सैनिकांना भारतीय सीमेतून हुसकावून लावले. यालाच कारगिल युद्ध म्हणूनही ओळखले जाते.
9 / 10
खरे तर, यापूर्वीही काही वेळा पाकिस्तानने शिमला करारावर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, यावेळी पाकिस्तानने शिमला करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
10 / 10
कुणाचा फायदा, कुणाचं नुकसान? - खरे तर, शिमला करारानंतर कारगील युद्ध आणि अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामुळे, पाकिस्तानने शिमला करार मोडण्याची औपचारिक घोषणा केली, तरीही त्याला काहीही फायदा होणार नाही. कारण शिमला करार तर फार पूर्वीच तुटला आहे. भारताचा विचार करायचा झाल्यास, पाकिस्तानच्या धोरणांमुळे भारताचे आधीच नुकसान होत आहे. यामुळे, नुकसान झाले, तर ते दोन्ही देशांचे होईल.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPOK - pak occupied kashmirपीओकेunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ