1 / 7आज म्हणजेच सात मे रोजी भारतातील सुमारे २५० जिल्ह्यांमध्ये युद्ध सज्जतेसाठी नागरिकांनी घेण्याच्या काळजीवर मॉक ड्रील घेण्याचे घोषित करण्यात आले होते. यामुळे पाकिस्तानचे सर्व लक्ष तिकडे वळविण्यात आले होते. भारतात मॉक ड्रील झाल्यानंतर भारत हल्ला करेल अशी पाकिस्तानची अपेक्षा होती. शत्रूला गाफिल ठेवत भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी पाकिस्तानवर हवाई हल्ले केले आहेत. 2 / 7भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यामध्ये दहशतवादी नेते हाफिज सईद आणि मसूद अझहर यांच्या लपण्याच्या ठिकाणांचा समावेश आहे. मुझफ्फराबाद, बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, कोटली, बाग, गुलपूर, भिंबर आणि शकरगढ येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला आहे. आज सुरु करण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर काय आहे...3 / 7२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवाद्यांना जमिनीत गाडणार असल्याची घोषणा केली होती. कसे आणि केव्हा प्रत्युत्तर द्यायचे हे ठरवण्यासाठी लष्कराला स्वातंत्र्य देण्यात आले होते. यासाठी व्यूहरचना करण्यात आली. भारतातील विविध शहरांत मॉक ड्रील करण्यात येणार होती. ती करण्यापूर्वीच भारताने पाकिस्तानवर हल्ले चढविले आहेत. 4 / 7 भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमध्ये क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. पाकिस्तानचा कोणत्याही लष्करी तळावर हल्ले करण्यात आले नाहीत. फक्त दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर ही एक संयुक्त कारवाई होती. यामध्ये, हवाई दल, लष्कर आणि नौदलाच्या अचूक स्ट्राइक शस्त्र प्रणालींचा वापर करण्यात आला. 5 / 7लष्कराच्या सार्वजनिक माहिती विभागाचे अतिरिक्त महासंचालकांनी एक्स हँडलद्वारे भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याची माहिती दिली. पहाटे १.२८ वाजता ६४ सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला. 'प्रहारय सन्निहितः, जया प्रतिष्ठाः' असे त्यावर लिहिले होते. हल्ला करण्यास सज्ज आणि जिंकण्यासाठी प्रशिक्षित, असा याचा अर्थ होतो. 6 / 7यानंतर याच अकाऊंटवर १:५१ वाजता दुसरी पोस्ट झळकली. ऑपरेशन सिंदूरच्या फोटोसह त्यावर न्याय झाला आहे, जय हिंद, असे लिहिण्यात आले होते. 7 / 7२२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केवळ पुरुषांवर हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नींना बाजुला करण्यात आले होते. दहशतवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले होते. हिंदू पुरुषांना वेगळे करून त्यांच्या कुटुंबियांसमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या हल्ल्यात अनेक महिलांनी त्यांचे पती गमावले. यापैकी अनेकजण नवविवाहित होते. ज्या महिलांनी आपले सिंदूर गमावले त्यांच्या सन्मानार्थ संदेश देण्यासाठी भारताने या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले.