CoronaVirus Live Updates : "कोरोनाचा धोका टळलेला नाही, निष्काळजीपणा नको, मास्क घाला"; ICMR तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:38 PM2022-04-20T18:38:44+5:302022-04-20T18:57:35+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा नवीन व्हेरिएंट आणि कोरोनाच्या नव्या लाटेची भीती वाढली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2067 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशभरात तब्बल 5,22,006 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा नवीन व्हेरिएंट आणि कोरोनाच्या नव्या लाटेची भीती वाढली आहे. अशा परिस्थितीत, मास्क घालणे आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं यासारख्या कोरोना नियमांचं पालन करणे आवश्यक आहे.

ICMR मधील महामारी विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी लोकांना लस घेण्याचे आणि कोरोना महामारीशी संबंधित इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. रमण गंगाखेडकर यांनी आतापर्यंत कोरोनाचे कोणतेही नवीन व्हेरिएंट समोर आलेले नाही. जे लोक वृद्ध आहेत, ज्या लोकांनी अद्याप कोरोनाची लस घेतलेली नाही आणि ज्या लोकांना लागण झाली आहे त्यांनी फेस मास्क वापरावा.

मला वाटत नाही की या व्हायरसचा सध्याचा संसर्ग हा कोरोनाची चौथी लाट आहे. Omicron प्रकारातील BA.2 या सब व्हेरिएंटमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात लोक प्रभावित झाले आहेत. कोरोनाची प्रकरणे वाढत असतानाही आपण मास्क वापरत आहोत.

आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकाने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, वाढत्या सामाजिक उपक्रमांमुळे, मास्क न घालणे आणि खबरदारी न घेणे यामुळे कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

प्राध्यापक अग्रवाल यांनी असेही म्हटले आहे की, सध्या कोरोनाच्या चौथ्या लाटेची कोणतीही चिन्हे नाहीत. याशिवाय, एपिडेमियोलॉजिस्ट आणि इतर तज्ञांनी लोकांना मास्क लावावे आणि सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून संसर्गाचा संभाव्य धोका टाळता येईल.

दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाची सक्रिय प्रकरणे वेगाने वाढली आहेत, त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे काही राज्यांची डोकेदुखीही वाढली आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या Exclusive माहितीनुसार, कोरोनाची प्रकरणे वाढत असतानाही लोक अजूनही तिसरा प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. सध्या 70 लाख लोकांनी प्रिकॉशन डोस घेतलेला नाही, जे कोरोनाचा बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत.

70 लाखांपैकी 46 लाख 15 हजार लोकांना बूस्टर डोस मिळाला आहे. त्याच वेळी, 1 कोटी फ्रंटलाइन वर्कर्स प्रिकॉशन डोससाठी पात्र आहेत, परंतु त्यापैकी केवळ 72 लाख फ्रंटलाइन वर्कर्सनी तिसरा डोस घेतला आहे.

60 वर्षांवरील लोकांची लोकसंख्या 11 कोटी 60 लाख आहे, त्यापैकी 2 कोटी लोक बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत, यापैकी 1 कोटी 35 लाखांनी बूस्टर डोस घेतला आहे. 18 - 59 वर्षे वयोगटातील लोकांची लोकसंख्या 68 कोटी 46 लाख आहे. त्यापैकी 2 कोटी लोक बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत, परंतु यापैकी केवळ 3 लाख लोकांनी हा डोस घेतला आहे.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारी म्हणून महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीलाच निर्बंधमुक्त झालेल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध लागण्याची शक्यता आहे.

केंद्राने या राज्यांना कोरोनाच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यकता भासल्यास संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी सर्व आवश्यक ती पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. देशामध्ये यावेळी सर्वाधिक कोरोना रुग्ण हे दिल्लीमध्ये सापडत आहेत.