सौदी अरेबिया महाराष्ट्राला देणार मोठा धक्का?; ४४ अब्ज डॉलरचा करार रद्द होण्याची भीती By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 10:48 AM
1 / 10 सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी असलेल्या सौदी अराम्कोनं चीनला मोठा धक्का दिला आहे. चीनसोबतचा १० अब्ज डॉलरचा (जवळपास ७५ हजार कोटी) करार रद्द केला आहे. 2 / 10 अराम्को कंपनी चीनसोबत मिळून एक तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि पेट्रोकेमिकल्स संकुल उभारणार होती. मात्र हा करार सौदीनं अचानक रद्द केला आहे. हा चीनला मोठा झटका मानला जात आहे. 3 / 10 कोरोना संकट काळात खनिज तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांना मोठं नुकसान सहन करायला लागत आहे. या परिस्थितीचा विचार करून अराम्कोनं चीनसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. 4 / 10 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसच कोरोना प्रकोप रोखू शकते. कोरोनावरील लस लवकर उपलब्ध होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे याचा परिणाम उद्योग क्षेत्रावर होणार आहे. 5 / 10 सौदी अराम्कोनं रद्द केलेल्या करारावर भाष्य करण्यास नकार दिला. तर अराम्कोची चिनी भागीदार कंपनी असलेल्या नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पोरेशन आणि पंजीन सिनसेनदेखील यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. 6 / 10 कोरोनामुळे जगातील बहुतांश देशांची अर्थव्यवस्था नाजूक स्थितीत आहे. इंधनाला फारशी मागणी नसल्यानं सौदीला मिळणारा महसूल कमी झाला आहे. त्यामुळे सौदी सरकार अडचणीत आलं आहे. 7 / 10 सौदी अराम्कोच्या उत्पन्नावर परिणाम झाल्यानं त्यांनी चीनसोबतचा करार रद्द केला. आता पुढचा क्रमांक भारताचा असू शकतो. भारतासोबतचा करारदेखील सौदी अराम्कोकडून रद्द केला जाण्याची शक्यता आहे. 8 / 10 सौदी अराम्कोनं भारतासोबत ४४ अब्ज डॉलरचा करार केला आहे. विशेष म्हणजे सौदी अराम्को महाराष्ट्रात रिफायनरी प्रकल्प उभारणार आहे. तशी घोषणा अराम्कोनं केली आहे. 9 / 10 नाणारमध्ये तेलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याचा अराम्कोचा मानस आहे. मात्र या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे आधीच प्रकल्प अडचणीत सापडला आहे. 10 / 10 आता सौदी अराम्कोला आर्थिक नुकसान सहन करावं लागत असल्यानं त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसू शकेल. तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द झाल्यास तो राज्यासाठी मोठा हादरा असेल. आणखी वाचा