मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:25 IST
1 / 6Adani Group AGM : आज(दि.२४) अदानी एंटरप्रायझेसची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) पार पडली. यावेळी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी जागतिक परिस्थिती आणि समूहाच्या वाटचालीबद्दल भाष्य केले. त्यांनी मध्य पूर्वेतील संघर्षाला ऊर्जा आणि लॉजिस्टिक्ससाठी एक मोठा धोका असल्याचे म्हटले. तसेच, अमेरिकेच्या परराष्ट्र विभाग आणि एफसीसीशी संबंधित आरोपांनाही उत्तर दिले. यासोबतच त्यांनी त्यांच्या महत्वकांशी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचाही उल्लेख केला.2 / 6मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम- गौतम अदानी यांनी एजीएममध्ये सांगितले की, मध्य पूर्वेमध्ये युद्ध सुरू आहे, ज्यामुळे ऊर्जा आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात अडचणी येऊ शकतात. या युद्धामुळे तेल आणि वायूच्या पुरवठ्यासोबतच किमतीवरही मोठा परिणाम होऊ शकतो. युरोपमध्ये आर्थिक आत्मविश्वास कमकुवत होत आहे, अमेरिकेलाही स्वतःच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या सर्वांमध्ये भारताने चमकदार कामगिरी केली आहे. जगातील इतर प्रमुख अर्थव्यवस्थांपेक्षा भारत वेगाने वाढत आहे. भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेने समूहाला जागतिक संकटांना तोंड देण्याचे धाडस दिले. भारताच्या प्रगतीने आपल्याला अडचणींमध्येही मोठी स्वप्ने पाहण्याचे शिकवले. 3 / 6अमेरिकन आरोपांवर थेट भाष्य- गौतम अदानी यांनी यावेळी अमेरिकन परराष्ट्र विभाग आणि एफसीसीशी संबंधित आरोपांना स्पष्ट उत्तर दिले. ते म्हणाले, ते सर्व आरोप निराधार आहेत. समूह नेहमीच नियमांचे पालन करतो आणि पारदर्शकतेने काम करतो. जेव्हा अदानी ग्रीन एनर्जीवर अमेरिकन परराष्ट्र विभाग आणि एफसीसीशी संबंधित आरोप लावले गेले, तेव्हा खूप गोंधळ उडाला. परंतु सत्य हे आहे की, अदानी समूहातील कोणताही व्यक्ती एफसीपीए (विदेशी भ्रष्टाचार कायदा) चे उल्लंघन केल्याबद्दल किंवा न्यायात अडथळा आणल्याबद्दल दोषी आढळले नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली. 4 / 6हिंडेनबर्गच्या कटाबद्दलही बोलले- गेल्या वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबद्दल बोलताना अदानी यांनी हिंडेनबर्ग अहवालाचा उल्लेख केला. ते म्हणाले, हिंडेनबर्गचा अहवाल काही खास माध्यमांनी हायलाइट केला होता. त्यांचा उद्देश आम्हाला बदनाम करणे आणि आमच्या कष्टाने मिळवलेल्या बाजारमूल्याला धक्का देणे, हा होता. पण, या कठीण काळातही समूहाने हिंमत गमावली नाही. अशा परिस्थितीत अनेक कंपन्या बुडाल्या असत्या, परंतु आमची मजबूत रोख स्थिती आमची ताकद बनली. आम्ही ४०,००० कोटी रुपयांचे अतिरिक्त भांडवल उभारले, ज्यामुळे पुढील दोन वर्षांसाठी कर्ज सहजपणे फेडण्याची व्यवस्था झाली. 5 / 6धारावीचा कायापालट करण्याचे स्वप्न- गौतम अदानी यांनी मुंबईच्या धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे वर्णन जगातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प म्हणून केले. ते म्हणाले, पुढील दहा वर्षांत आम्ही धारावीचा पूर्णपणे कायापालट करू. हा प्रकल्प १० लाखांहून अधिक लोकांना सन्मानाचे जीवन देईल. हा प्रकल्प अदानी समूहाची मोठी विचारसरणी दर्शवितो. धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीचे कायापालट करणे सोपे नाही, परंतु आम्ही त्याची जबाबदारी घेतली आहे. हे केवळ व्यावसायिक काम नाही तर सामाजिक बदलाचे एक ध्येय आहे.6 / 6२०३० पर्यंत १०० गिगावॅटचे लक्ष्य- अदानी समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान अदानी यांनी ग्रीन इंडियामध्ये जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा पार्क बांधला जात असल्याचे सांगितले. हा पार्क इतका मोठा असेल की, तो अवकाशातूनही दिसेल. अक्षय आणि पंप जलविद्युत उत्पादन क्षमतेसह थर्मल एकत्रित करून, अदानी ग्रीनची क्षमता २०३० पर्यंत १०० गिगावॅट असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.