२ लाख ४२ हजार हेक्टरवर होणार सोयाबीनची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:17 AM2021-05-08T04:17:23+5:302021-05-08T04:17:23+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा महत्त्वाचा असतो. या हंगामातील उत्पादनावर शेतकरी एका वर्षाचे आर्थिक नियोजन करतो. त्यानुसार कृषी विभागाकडून ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा महत्त्वाचा असतो. या हंगामातील उत्पादनावर शेतकरी एका वर्षाचे आर्थिक नियोजन करतो. त्यानुसार कृषी विभागाकडून २०२१-२०२२ या खरीप हंगामासाठी पीक निहाय पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच त्यासाठी लागणारे बियाणे, खत आदीबाबत पावले उचलली जात आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने २०२१-२०२२ च्या खरीप हंगामासाठी ५ लाख २२ हजार १०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार २ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, त्यापाठोपाठ १ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, ८ हजार हेक्टर क्षेत्रावर उडीद, २४ हजार हेक्टर क्षेत्रावर मूग, ४६ हजार २५० हेक्टरवर तूर तर ४ हजार २५० हेक्टरवर खरीप ज्वारीसाठी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्याचबरोबर जिल्हा कृषी विभागाच्या वतीने प्रस्तावित केलेल्या पिकांना लागणारा रासायनिक खताचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. १ लाख ५४ हजार २०० मेट्रिक टन खताची मागणी या कार्यालयाने लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे नोंदविली आहे. त्यानुसार १ लाख ७० हजार ८८० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजुरीही झाले आहे. आतापर्यंत २४ हजार २६० मेट्रिक टन खताचा पुरवठा ही जिल्ह्याला झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून आगामी खरीप हंगामाचे नियोजन करून तयारीही पूर्ण करण्यात आली आहे
दहा भरारी पथकाची स्थापना
बोगस बियाणे व इतर बाबतीत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या गतवर्षीच्या तक्रारी लक्षात घेऊन यावर्षी जिल्ह्यात १० भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच परभणी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कृषी निविष्ठाचे केंद्र शासनाच्या परवानगीने कृषी दुकाने सुरू आहेत. यामध्ये ७६७ बियाणे, ८४४ रासायनिक खते व ८४४ कीटकनाशके औषधे विक्रीचे दुकाने जिल्ह्यात आहेत.
एक जून पर्यंत कापसाचे बियाणे विक्रीस बंदी
जिल्ह्यात मागील काही हंगामात शेंदरी बोंड आळीच्या प्रादुर्भावाचा अनुषंगाने यावर्षी पुणे येथील कृषी आयुक्तालय संचालक यांनी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १ जून पर्यंत कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे १ जून पासूनच कापसाची विक्री परवानाधारक निविष्ठा दुकानातून होणार आहे.
शेतकऱ्यांनी स्वतःकडील असलेले सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे. त्याचबरोबर बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उन्हाळी कापसाची लागवड न करता १ जून नंतरच कापसाची लागवड करावी.
-संतोष आळसे, जिल्हा कृषी अधीक्षक परभणी.