रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:15 AM2021-03-24T04:15:29+5:302021-03-24T04:15:29+5:30
कापसाच्या भाववाढीने शेतकरी संतापले परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याकडील संपूर्ण कापूस विक्री केल्यानंतर प्रतिक्विंटल सहा हजाराहून अधिक भाव आता ...
कापसाच्या भाववाढीने शेतकरी संतापले
परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याकडील संपूर्ण कापूस विक्री केल्यानंतर प्रतिक्विंटल सहा हजाराहून अधिक भाव आता कापसाला मिळत आहे. त्यामुळे जोपर्यंत कापूस शेतकऱ्यांकडे आहे. तोपर्यंत कापसाचे भाव ५ हजार ७०० च्या वर आले नाहीत. मात्र, शेतकऱ्यांकडील कापूस विक्री केल्यानंतर कापसाचे भाव वधारले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संतापले आहेत.
कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ
सेलू : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता संसर्ग लक्षात घेता सेलू प्रशासनाच्या वतीने नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. मात्र, आजही शहरातील रस्त्यावरून विनामास्क व सोशल डिस्टन्सकडे दुर्लक्ष करून नागरिक फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. याकडे तालुका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
पाणीपुरवठा योजना अपूर्णच
जिंतूर : तालुक्यात मागील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री पेयजल व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या वर्णा, वडाळी, असोला येथील योजना पूर्णत्त्वास गेल्या आहेत. मात्र, भोगाव येथील योजनेची किरकोळ कामे बाकी आहेत. तसेच लिंबाला येथील केवल विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. दुधगाव येथील वादग्रस्त योजनेचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तर मांडवा या गावातील योजनेचे तीस टक्के काम बाकी आहे.
शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट
जिंतूर : शहरातील टिपू सुलतान चौकात डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असले तरी हे काम करताना डांबराचा अत्यल्प वापर होत आहे. त्यामुळे हे काम किती दिवस टिकेल, याची शाश्वती नाही. यापूर्वी या भागांमध्ये वर्षातून दोन ते तीन वेळा दुरुस्तीचे काम केले गेले आहे. त्यामुळे या रस्त्यांवर वारंवार पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा
परभणी: जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपीट होत असल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे
दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा
सेलू: तालुक्यात वाळूमाफिया पुन्हा सक्रिय झाले असून, दुधना नदी पात्रातून दिवस-रात्र वाळूचा अवैध उपसा केला जात आहे. ट्रॅक्टरमधून सर्रास या वाळूची वाहतूक केली जात असून, यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. वाळूला सोन्याचे भाव आल्याने वाळूमाफिया मालामाल होत आहेत.
५४१ हेक्टरवर उसाची लागवड
सोनपेठ तालुका: मुबलक पाण्याचा परिणाम
सोनपेठः तालुक्यात यावर्षी सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत चांगला पाऊस झाला. या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान केले असले तरी दुसरीकडे नदी, नाले, तलावात मुबलक पाणीसाठा झाला. त्यामुळे तालुक्यात यावर्षी ५४१ हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे.
पांढऱ्या सोन्याची पेठ म्हणून सोनपेठ तालुक्याची ओळख आहे. यावर्षी मुबलक पाणीसाठा झाल्याने उसाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
बिल न देताच महावितरणची वसुली
परभणी: जिल्ह्यात ९२ हजार कृषिपंपधारक असून, या कृषिपंप धारकांना वर्षानुवर्ष महावितरणकडून विद्युत बिल देण्यात आले नाही. मात्र, मार्च एन्डच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा भाडे आकारून वसुली केली जात आहे. त्यामुळे कृषिपंप धारकांमध्ये महावितरणच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तीन वर्षांपासून सिग्नल व्यवस्था धूळखात
परभणी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, बसस्थानक परिसर, शिवाजी चौक, जाम नाका व महाराणा प्रताप चौकात लाखो रुपये खर्च करून वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून ही यंत्रणा धूळखात पडून आहे. या यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दिग्रस बंधाऱ्यातील पाणी गेले वाहून
परभणी: तालुक्यातील दिग्रस येथील दुधना नदी पात्रात लाखो रुपये खर्च करून बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधार्यातील पाणी अडवून डिग्रस व आर्वी येथील पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, मागील काही दिवसांपासून या बंधाऱ्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे या बंधाऱ्यात अडवलेले पाणी झिरपून जात आहेत. याकडे जलसंपदा विभागाने लक्ष देऊन या बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
डाव्या कालव्याची दुरवस्था
परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची दोन वर्षांमध्येच दुरवस्था झाली आहे. जिंतूर तालुक्यातील कुंभारी, मारवाडी, पिंपळगाव, कौसडी आदी गाव परिसरातील या प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या फरशा जागोजागी उखडल्या आहेत. त्यामुळे या पाण्याचा शेतकऱ्यांना उपयोग होण्याऐवजी नुकसानच जास्त होत आहे. याकडे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
दिग्रसफाटा रस्त्याच्या कामांना मिळेना गती
परभणी : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तालुक्यातील दिग्रस फाटा ते जलालपूर पाटी या रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्यावर संबंधित कंत्राटदाराने गिट्टी अंथरून ठेवली आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यासाठी निधी उपलब्ध असतानाही मागील अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी मांडवा ग्रामस्थांमधून होत आहे.
शहीद दिनी हुतात्म्यांना अभिवादन
सेलू: स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या हुतात्म्यांना शहीद दिनानिमित्त मंगळवारी शहरातील नूतन विद्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक अशोक वानरे, उपमुख्याध्यापक रामकिशन मखमले, रघुनाथ सोनेकर, उज्ज्वला लड्डा, अनंत कुमार विश्वंभर आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ग्रामस्थांना करावा लागतो पाणीटंचाईचा सामना
गंगाखेड: तालुक्यातील गोंडगाव येथील विद्युत पुरवठा मागील काही दिवसांपासून थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर गोंडगाव येथील ग्रामस्थांना गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या नागनाथ निवृत्ती पुकाने यांच्या शेतातील जलस्रोतावरून पाणी भरावे लागत आहे.