मीटरची गती कमी करून दीड लाख रुपयांची वीजचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:19 AM2021-02-24T04:19:30+5:302021-02-24T04:19:30+5:30
वीजचोरीला आळा बसविण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने शहरात नवीन रेडिओ फ्रिक्वेन्सीवर आधारित आधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर बसविले आहेत. महावितरणचे अधीक्षक अभियंता ...
वीजचोरीला आळा बसविण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने शहरात नवीन रेडिओ फ्रिक्वेन्सीवर आधारित आधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर बसविले आहेत. महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद क्षीरसागर व पथकाने मंगळवारी शहरातील माळी गल्ली भागातील विद्युत ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली. तेव्हा ४ मीटरमध्ये अनधिकृतरीत्या फेरफार करून वीजचोरी होत असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने नऊ ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली. त्यात ४ ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून मीटरची गती कमी करीत १० हजार ७०० युनिटची वीजचोरी केल्याचे आढळले. या चारीही ग्राहकांचे स्थळ पंचनामे करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
वीजचोरीची माहिती देणारी प्रणाली कार्यान्वित
महावितरण कंपनीने रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्संट्रेटर युनिट प्रणालीवर आधारित वीज मीटर शहरात बसवले आहेत. या मीटरच्या साहाय्याने ग्राहक वीजचोरी करीत असेल तर त्याची माहिती केंद्रीय सर्व्हरमधून मिळते. शहरात आतापर्यंत ४५ हजार आरएफ मीटर बसविण्यात आले आहेत. या प्रणालीच्या साहाय्याने ग्राहकांचे अचूक मीटर वाचन नोंदवले जाते. प्रत्येक १५ मिनिटांनी ग्राहक किती विजेचा वापर करीत आहे, त्याची माहिती उपलब्ध होते. तसेच त्या भागातील वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रावर त्यावेळी किती वीज भार आहे, याचीही अचूक माहिती या प्रणालीतून मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांनी अधिकृतपणे वीज वापर करावा, वीज मीटरमध्ये छेडछाड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.