उपलब्ध पाण्यावर वाढले सिंचन
परभणी : जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने रबी हंगामात मोठ्या प्रमाणात सिंचन झाले आहे. मागील दहा वर्षांच्या तुलनेत यावर्षी सिंचन क्षेत्र वाढले आहे. जायकवाडी, निम्न दुधना या दोन्ही प्रकल्पाचे तीन पाणी आवर्तन प्रथमच रब्बी हंगामात उपलब्ध झाले आहेत. याशिवाय येलदरी प्रकल्पातून शेतजमिनीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने रब्बी हंगामात उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
वाळूची अवैध वाहतूक सुरूच
परभणी : जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध पोलीस प्रशासनन दररोज कारवाई करत आहे. मात्र, अजूनही वाळूची अवैध वाहतूक थांबलेली नाही. महसूल प्रशासन या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे नदीपात्रातून सर्रास वाळूचा उपसा करून त्याची बेभाव विक्री करण्याचा व्यवसाय अनेकांनी सुरू केला आहे. त्यात सर्वसामान्य नागरिकांना मात्र आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण
परभणी : जिल्ह्यात अजूनही रब्बी हंगामातील पीक कर्जवाटप पूर्ण झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करून रब्बीची पेरणी करावी लागली. रब्बी हंगामात सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, बँक प्रशासनाने मनमानी कारभार करत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ केली. परिणामी उद्दिष्ट अधुरे राहिले आहे.
जिल्ह्यात वाढेनात रोहयोची कामे
परभणी : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे उपलब्ध करण्यास शासकीय यंत्रणा उदासीनता दाखवत आहेत. कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोठ्या प्रमाणात रोहयोची कामे सुरू केली जाऊ शकतात. मात्र, उदासीन धोरणांमुळे कामांची संख्या वाढली नाही. परिणामी मजुरांनी नोंदणी केल्यानंतरही त्यांना काम उपलब्ध होत नसल्याची स्थिती सध्या जिल्ह्यात आहे.
खड्ड्यांमुळे वाढला वाहनधारकांचा त्रास
परभणी : जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी चारही मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वसमत, जिंतूर, गंगाखेड आणि पाथरीकडे जाणारे रस्ते खड्डेमय झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असली तरी ही कामे संथगतीने होत आहेत. परिणामी त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
बसस्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी
परभणी : येथील बसस्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी होत असून, कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. अनेक प्रवासी विनामास्क फिरतात. विशेष म्हणजे इतर जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने एस.टी. महामंडळानेही या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.