२७ अल्पवयीन मुली पळून गेल्या, पोलिसांना सापडल्या २३ जणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:18 AM2021-07-28T04:18:22+5:302021-07-28T04:18:22+5:30
जिल्ह्यात अल्पवयीन मुली पळून जाण्याचे तसेच बेपत्ता होण्याचे प्रमाण कोरोनापुर्वी अधिक होते. हे प्रमाण कोरोनाच्या काळात घटल्याचे दिसून ...
जिल्ह्यात अल्पवयीन मुली पळून जाण्याचे तसेच बेपत्ता होण्याचे प्रमाण कोरोनापुर्वी अधिक होते. हे प्रमाण कोरोनाच्या काळात घटल्याचे दिसून येते. मागील दीड वर्षात मुले आणि मुली मिळून एकूण ११० गुन्हे दाखल आहेत. यातील ६८ मुलींचा शोध लावण्यात पोलीसांना यश आले आहे. यामध्ये काही अल्पवयीन मुली किरकोळ कारणावरुन पळून गेल्याचे समजते.
४ मुलींचा शोध लागणे बाकी
गेल्या दीड वर्षात ७७ मुली हरवल्या आहेत. यात २०२० मध्ये ५० मुली हरवल्या. यापैकी ४५ मुली सापडल्या आहेत. तर मे २०२१ पर्यंत २७ मुली हरवल्या आहेत. यातील २३ मुली सापडल्या आहेत. सध्या ४ मुलींचा शोध लागणे बाकी आहे.
कोरोनाकाळात बालविवाह वाढले
जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकारही कोरोनाकाळात वाढले आहेत. यामध्ये एका प्रकरणात दहावीच्या विद्यार्थीनीचा बालविवाह झाल्याचा प्रकार घडला आहे. मागील दोन वर्षात तीन प्रकरणात गुन्हे दाखल झाले तर दोन वर्षात २८ बालविवाह थांबविण्यात आले आहेत.
अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना
२०२० - ५०
२०२१ मे पर्यंत २७
मुला-मुलींचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र
मुले तसेच मुली वयात आल्यावर शाळा, महाविद्यालयात गेल्यानंतर त्यांचे वागणे, बोलणे बदलू शकते. जसे मित्र, मैत्रिणी सोबत असतात त्याप्रमाणे त्यांच्यात बदल होतो. अशावेळी अनेकदा मित्र-मैत्रिणींची चांगल्या बाबीसाठी स्पर्धा न लागता तुझ्याप्रमाणे मीही हे करु शकतो. असे म्हणून त्यांचे पाऊल वाकडे पडू शकते. हे ओळखण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे.
प्रेम प्रकरणातून वाढल्या घटना
ग्रामीण भागात असो की शहरी भागात अल्पवयीन मुला-मुलींच्या प्रेम प्रकरणाचे अनेक प्रकार समोर येतात. यातून काही मुले-मुली घरी न सांगता पळून जाण्याचे पाऊल उचलतात. याची पूसटशी कल्पनही आई-वडीलांना नसते. मग यानंतर घरातील सदस्य पळून गेल्याचा गुन्हा दाखल करतात.
मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक
अल्पवयीन मुले आणि मुली यांच्यात बेपत्ता होणे तसेच पळून जाण्याच्या प्रकारात सर्वाधिक गुन्हे हे मुलींचे दाखल होतात. यामध्ये अपहरणाचा गुन्हा नोंद होतो. जिल्हा पोलीस दलातील आकडेवारीवरुन हे दिसून येते. मात्र, पोलीसांच्या वेगवेगळ्या शाखांकडून ह्या गुन्ह्यात दिरंगाई न करता मुला-मुलींचा शोध घेतला जातो.