मुदत संपूनही २३ हजार जणांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:39 AM2021-09-02T04:39:25+5:302021-09-02T04:39:25+5:30
परभणी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला असला तरी २३ हजार ५१७ नागरिकांनी दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्यानंतरही लसीकरण ...
परभणी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला असला तरी २३ हजार ५१७ नागरिकांनी दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्यानंतरही लसीकरण करून घेतले नाही. कधी लसीचा तुटवडा तर कधी नागरिकांचा निष्काळजीपणा होत असल्याने हा आकडा वाढला आहे.
मागील महिनाभरापासून लसीकरणाला प्रतिसाद वाढला आहे. मात्र आतापर्यंत दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्यानंतरही लस न घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. सध्या मुबलक प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध झाला आहे.
दुसरा डोस घेणेही तितकाच आवश्यक
n कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. तरच लस परिणामकारक ठरणार आहे.
n शरीरात पूर्णत: ॲण्टीबॉडीज् वाढण्यासाठी दोन्ही डोस घ्यावे लागतील. तरच कोरोनापासून नागरिक सुरक्षित होऊ शकतात.
नेमकी अडचण काय?
जिल्ह्यात मागील महिन्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे तारीख आल्यानंतरही अनेकांना लस घेता आली नाही. काही जण जास्तीत जास्त उशिरा लस घेतली तर चांगला परिणाम होतो, अशा समजुतीतून उशिरा लस घेत आहेत. तर कोरोना कमी झाल्याने नागरिकांची भीती कमीही कमी झाली आहे. त्याचाही परिणाम लसीकरणावर होत आहे.
चार दिवसांपूर्वीच जिल्ह्याला ९० हजार लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लसीची कमतरता भासणार नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी दोन्ही डोसचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
- डॉ.रावजी सोनवणे, लसीकरण प्रमुख