आपलं डोकं आहेच सुपरफास्ट !
By Admin | Updated: September 4, 2014 17:28 IST2014-09-04T17:28:05+5:302014-09-04T17:28:05+5:30
अनिरुद्ध शर्मा नावाचा एक साधा तरुण. बॅकबेंचर. शाळेत, वर्गात पहिलं-दुसरं येणं, खूप मार्कस् मिळवणं, रॅटरेसमध्ये धावत धापा टाकणं. यातलं या मुलानं काहीही केलं नाही, पण तरीही त्याला जे सुचलं ते किती अफलातून होतं!

आपलं डोकं आहेच सुपरफास्ट !
कल्पेश रानडे, नाशिक
हातात फक्त एक स्मार्टफोन आणि एक ‘विशेष’ बूट!
-बस, एवढय़ा दोन गोष्टी असल्या तरी जगात तुम्ही कुठेही जाऊ शकता, काहीही करू शकता!
त्यासाठी रस्ता माहीत असण्याची गरज नाही, कोणाला पत्ता विचारण्याची गरज नाही, एवढंच काय, तुम्हाला दृष्टी, डोळे असण्याचीही गरज नाही. व्वा! काय अफलातून कल्पना आहे!
8 ऑगस्टच्या ‘ऑक्सिजन’मधली ‘लेचल’ ही स्टोरी वाचली, फार आवडली, पण त्यापेक्षाही एका गोष्टीनं मनात घर केलं, ती म्हणजे त्यामागची आयडिया आणि त्यामागे असलेलं एका कोवळ्या तरुण भारतीयाचं डोकं! आता यापूर्वी काय कोणाकडे स्मार्टफोन नव्हते, बूट काय कोणी पहिल्यांदाच घातले?
अनिरुद्ध शर्मा नावाचा एक साधा तरुण. बॅकबेंचर. शाळेत, वर्गात पहिलं-दुसरं येणं, खूप मार्कस् मिळवणं, रॅटरेसमध्ये धावत धापा टाकणं. यातलं या मुलानं काहीही केलं नाही, पण तरीही त्याला जे सुचलं ते किती अफलातून होतं! भारतीय तरुणांच्या संदर्भात ही फार मोठी गोष्ट सध्या घडताना दिसते आहे. आंतरराष्ट्रीय क्षीतिजावर धडक देण्याची धमक त्यांच्यात आहे.
असे कितीतरी तरुण आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांची स्वप्न आहेत, त्यांच्याकडे आयडिया आहेत, काहींना त्यांच्या आयडिया प्रत्यक्षात उतरवता आल्या, तर काहींना नाही!
पण वेगळ्या दिशेनं विचार करण्याची आणि स्वत:बरोबर इतरांनाही पुढे घेऊन जाण्याची या तरुणांची मानसिकता हेच आपलं भविष्यकाळातलं भांडवल आहे. आपल्याकडची आयआयटीची तरुण पोरं बघा, प्रत्येक जण काहीना काही तरी करतो आहे, आपल्या आयडियाज वापरून सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटतं आहे.
कोणी स्वस्तातील स्वस्त आणि तरीही टिकाऊ घरं कशी तयार होतील यासाठी प्रय} करतो आहे, कोणी ग्रामीण भागातही प्रत्येक घरात वीज कशी पोहोचेल यासाठी झगडतो आहे, कोणी खेडय़ापाडय़ातल्या लोकांना स्वच्छ पाण्याचे पर्याय देतो आहे, कोणी दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करतं आहे, कोणी प्रदुषणावर पर्याय म्हणून हायड्रोजनचाच इंधन म्हणून वापरायचा प्रय} करतो आहे, कोणी अपंगांसाठी उपयुक्त साधनं बनवतं आहे, तर कोणी कचरा कमी करण्यासाठी आणि उचलण्यासाठी पर्यावरणस्नेही स्वस्त सायकल!
सर्वसामान्य समाजाविषयी भारतीय तरुणांना वाटणारी आत्मियता आणि त्यासाठी ‘समाजसेवेचं’ कुठलंही पांघरून स्वत:भोवती न गुंडाळता त्यांचं सुरू असलेलं काम हा आजच्या भारतीय तरुणाईचा ‘यूएसपी’ आहे, असं मला वाटतं.
-----------------
कौन कहता है, आसमां मे सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबियतसे उछालो यारो. अशी धमक तुमच्यामधे असताना निराशेचं वादळ का घेरतं? काहीच चांगलं घडत नाही, असं कसं म्हणता? अगदी टोकाचं उदाहरण घ्या, बंद घडय़ाळदेखील दिवसातून दोन वेळा अचूक वेळ दाखवतंच. हा इतका पॉङिाटिव्ह अॅप्रोच ठेवा, बदल नक्की घडेल..
- राजेंद्र दर्डा
www.facebook.com/social.teamaurangabad