चंद्रपूरचा तरुण डॉक्टर जेव्हा उत्तरं शोधतो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 06:00 IST2018-09-06T06:00:00+5:302018-09-06T06:00:00+5:30
मी चंद्रपूरचाच. याच भागात वाढलो. इथले आरोग्याचे प्रश्न, माणसांची परवड सारं अवतीभोवती पाहतच मोठा झालो. तेव्हाच ठरवलं, डॉक्टर व्हायचं, इथंच वैद्यकीय सेवा द्यायची त्या वाटेवर निघालोही. आणि नव्यानं समजत गेल्या अनेक गोष्टी, वेगळे प्रश्नही!

चंद्रपूरचा तरुण डॉक्टर जेव्हा उत्तरं शोधतो...
सूरज म्हस्के
मी मूळचा चंद्रपूरचाच. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यातलं म्हस्के डोंगरगाव नावाच्या गावचा. माझे बहुतेक नातलग गडचिरोली लगतच्या खेडय़ांमध्ये असल्यानं माझं बालपण हे चंद्रपूर शहर, ग्रामीण गडचिरोली याच भागात गेलं. मी संयुक्त कुटुंबात वाढलो. आजी-आजोबा, मोठे वडील-मोठी आई, दोन काका-काकू आणि आई-बाबा. माझं कुटुंब पूर्वीचं मालगुजारांचं कुटुंब असलं तरी बदलत गेलेल्या काळानुसार आजोबा हे चंद्रपूरला स्थायिक झाल्यावर काही व्यावसायिकांकडे दिवाणजी काम करायचे व वडील सध्या लाइट फिटिंग, कुलर दुरुस्ती, अशी काम करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील कुठल्याही साधारण कुटुंबाची परिस्थिती असेल तशी आमची परिस्थिती. पूर्वजांच्या कष्टामुळे कधी खाण्यापिण्याची आबाळ झाली नाही; मात्न त्यांच्याचं विवेक व विचारपूर्ण जगण्याच्या पद्धतीनेच मला इथर्पयत पोहोचायला मदत झाली. भरीव सामाजिक कार्यात कुटुंब नसलं तरी आजोबा हे गांधी विचारांनी जगणारे होते. सधनता असली तरी उपभोगाची सवय आम्हाला लागू नये म्हणून गरज नसलेलं सामान कधी घरात घेतलेलं आठवत नाही. पुढे तीच सवय आम्हालाही लागली. कुठलंही काम नियोजनपूर्वक व वेळेत जबाबदारीने कसं करावं हे त्यांनी त्यांच्या वागण्यातून शिकवलं.
ग्रामीण भागातच वाढलो त्यामुळे इथलं वैद्यकीय वास्तव हे मला अनुभवाने माहीत होतं. आजोबांसोबत या गोष्टीची चर्चा व्हायची. नातलगांना साध्या साध्या गोष्टींसाठी चंद्रपूरला यायला लागायचं, तेच अजूनही आहे. त्यांचे प्रश्न ऐकून व गावाकडे फिरताना, पाहून पाहून बर्याच गोष्टी कळत होत्या. सोबतच न परवडणारी वैद्यकीय व्यवस्था शहरात राहून आम्हीही अनुभवत होतोच. त्यामुळे डॉक्टर व्हावं हे मला सहज वाटायचं. ही परिस्थिती बदलावी असं वाटायचं. डॉक्टर होऊन मी गावात दवाखाना सुरू करावा हे स्वप्न मला दाखवणारे आणि ते स्वप्न दृढ करणारे माझे आजोबाच. पुढे मी नागपूरच्या शासकीय कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेशही घेतला.
कॉलेजला असतानाच मला निर्माणविषयी कळालं आणि वर्षभरात ‘निर्माण’च्या शिबिरात सहभागी झालो. निर्माण प्रक्रियेचा मला विविध अंगांनी उपयोग झाला. सर्वात महत्वाचं म्हणजे असा विचार करणारा मी एकटा नाहीये, तर माझ्यासारखा विचार करणारे अनेक आहेत. निर्माण शिबिरात भारतातील, महाराष्ट्रातील व सोबतच जगभरातील वैद्यकीय व्यवस्थेचं चित्न, वैद्यकीय व्यवसायचं सार्वजनिक, खासगी व्यवस्थेतील कट प्रकार, खासगी व्यवसाय करून या गोष्टी टाळणार्या माणसांच्या मुलाखती, जेनेरिक औषध त्यातील समज-गैरसमज याबाबत मार्गदर्शन व चर्चा झाल्या. सार्वजनिक आरोग्य या विषयाचं भारतासारख्या लोकसंख्येच्या दृष्टीने मोठं व विकसनशील असणार्या देशाच्या दृष्टीने महत्त्व समजलं. ही झाली तांत्रिक माहिती; मात्न या माहितीचा उपयोग करत, डोळसपणे मी माझ्या स्वभावानुरूप कुठला मार्ग निवडावा हे लक्षात आलं. निर्णय घेत पुढील जगण्याला लागणारं वेळापत्नक आखण्याची प्रक्रियादेखील शिकलो. वर्षभराचा, पाच वर्षाचा व दहा वर्षाचा ध्येयांचा आराखडा बनवला. सामाजिक क्षेत्नात विचारपूर्वक काम करणार असलो म्हणून घरावर तुळशीपत्न ठेवावं असं नाही. उचित विवेकपूर्ण आर्थिक नियोजनातून स्वतर्ची, आईवडिलांची व भविष्यात वाढणार्या कुटुंबाची अडचण होणार नाही याकरता आर्थिक नियोजन कसं करू हेपण समजलं. त्याचीच पहिली पायरी म्हणून इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर ‘सर्च’ संस्थेत आदिवासी भागात चालणार्या फिरत्या वैद्यकीय पथकाचा आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. एक वर्षभर ती जबाबदारी पार पाडली.
आदिवासी आरोग्य विभागात चालणारा हा फिरता दवाखाना हा ‘राष्ट्रीय आरोग्य मिशन’ महाराष्ट्र शासन व ‘सर्च’ यांच्या संयुक्त रीतीने चालणारा कार्यक्रम आहे. त्याच्या नियोजनाच्या मार्गदर्शिका या शासनाने ठरवल्या आहेत आणि त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी संस्थेकडे दिली आहे. फिरत्या आरोग्य पथकाच्या टीममध्ये आरोग्य अधिकार्याच्या व्यतिरिक्त, औषधी तंत्नज्ञ, प्रयोगशाळा तंत्नज्ञ, दोन आरोग्यसेविका आणि दोन वाहनचालक अशी एकूण आमची सात जणांची टीम होती. गावांच्या लोकसंख्येच्या हिशोबाने साधारणतर् दिवसाला दोन गावातील दवाखान्यांना भेटी दिल्या. फिरत्या आरोग्य पथकाच्या जबाबदारीमध्ये डॉक्टर म्हणून काम पाहताना सोबतच टीमचे नियोजन, त्यांच्या अडचणी समजून निवारण करणं, शासकीय मीटिंगला जाणं हे व्हायचंच. ‘सर्च’नी दिलेल्या या संधीतून मी आदिवासी समाजाची सेवा तर करूच शकलो मात्न धानोरा तालुक्यातील आदिवासी लोकांनी व ‘सर्च’संस्थेने या दरम्यान माझे भरपूर शिक्षण केले, जे महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा अधिकच होय.
एक महत्त्वाची घटना तुम्हांला या निमित्ताने सांगतो. गडचिरोलीला मलेरिया मोठय़ा प्रमाणात होतो. साधारण ऑगस्टच्या दुसर्या आठवडय़ात मलेरियाच्या केसेस भरपूर प्रमाणात आदिवासी गावांमधून येऊ लागल्या. टवेटोला व गठांनेली या गावांमध्ये सर्वाधिक केसेस होत्या. महावाडा या गावी 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता व रेखाटोला या गावच्या एका महिलेचा मृत्यू हा मलेरियाचा म्हणून संशयित होता. अशा परिस्थितीत 48 गावांवर लक्ष ठेवून मलेरिया नियंत्नण करायचं होत. हे टीम वर्क होतं. अशा साथीच्या वेळेला कमी वेळात योग्य नियोजन, सुट्टीचा दिवस व कामाची वेळ सोडून करणं किती महत्त्वाचे आहे व आपल्या कार्यक्षेत्नात एकही मृत्यू होऊ नये म्हणून कसं कार्यरत राहावं यासाठीच भरीव अनुभव होता. या दरम्यान एका महिन्याच्या कालावधीत 182 मलेरियाच्या रु ग्णांचा उपचार करण्यात आला.
मागच्या एका वर्षात मलेरिया, पाठ कंबरदुखी, श्वसनविकार, त्वचेचे विकार, रक्तक्षय, हगवण यापाठोपाठ उच्च रक्तदाब यासारख्या आजाराने ग्रासलेले 20,440 रुग्ण मी या वर्षभरात तपासलेत.
या काळात मला ग्रामीण भागात काही आरोग्याचे गंभीर प्रश्न आढळले. त्यातलाच एक मानसिक आरोग्याचा प्रश्न. दुसरं म्हणजे डोळ्यांचे आजार, स्त्रियांचे आजार, दातांचे विकार हे प्रश्न गंभीर आहे. सुविधा नाहीत, दातांसारख्या आजारासाठी डॉक्टर नाहीत त्यामुळे हे विकार बरे होत नाहीत.
या वैद्यकीय गोष्टींपलीकडेही मला काही गोष्टी समजल्या. आदिवासी लोकांसोबत काम करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या, त्या म्हणजे, लोकांना समजावलं तर कळतं. समजावणारा, सांगणारा पाहिजे. धानोरा तालुक्यातील आदिवासींनी यापूर्वीच ‘पेसा कायदा’ व ‘वनहक्क कायदा’ मिळवून संपूर्ण देशाला दाखवून दिलेला आहे. त्यांना उपकाराची नाही तर सोबतीची गरज आहे. त्यांना येऊन जुळणारा प्रत्येक हात महत्त्वाचा आहे. तुम्ही आदर कराल तर ते दुपटीने आदर करतील. त्यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे.
अत्यंत मायाळू, प्रेमळ, अदबशीर, शांत वृत्तीची, जगण्यात कलात्मकता असलेली, सांघिक भावना जपणारी, मोकळ्या वृत्तीची माणसं आहेत ही. दवाखाना झाल्यावर गावातच जेवणाची व्यवस्था असते, त्यांचे आदरातिथ्य कमालीचे वाटते. या समाजातील अनेक प्रथा स्तुत्य आहेत. मुलामुलींमधील संबंध हे मोकळ्या वृत्तीचे आहे. मुलींना मुलगा निवडायचा अधिकार आहे व हे समाजमान्य आहे. आदिवासी लोकांची लग्नाची पद्धत ही सामूहिक आहे. हातमिळवणी म्हणून सर्व लोक लग्नघरच्या व्यक्तीला जमेल तशी पैशाची, अनाजाची व सामानाची मदत करतात. लग्नाआधी मुलगी गर्भार राहिल्यावर जर मुलाने किंवा कुटुंबीयांनी तिला स्वीकारले नाही तर दंड बसविण्याची व्यवस्था समाजाने केली आहे.
पण या सोबतच याभागात दारूचं व्यसन प्रचंड आहे. आजही पारंपरिक वैदू पद्धतीवर त्यांचा विश्वास आहे. हे सारं पाहून, अनुभवून मी ठरवलंय चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातच वैद्यकीय सेवा द्यायची. पुढील प्रवास हा ठरलेल्या ध्येयाच्या दिशेने सुरू राहील. चंद्रपूरचा प्रदूषणाचा प्रश्न मोठा आहे हे आपण सर्व जाणतो. प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणार्या परिणामांचा अभ्यास करून त्यासाठी काम करण्याचा माझा पुढचा मानस आहे. त्यासाठी लागणारं कौशल्य ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रसूती व त्यातील अडचणींना मला न्याय देता यावा म्हणून त्यात कौशल्य मिळवावं असं वाटतं म्हणून मी जानेवारीपासून छत्तीसगड येथील दल्लीराजहरा स्थित ‘शहीद रुग्णालय’ येथे आरोग्य अधिकारी म्हणून रुजू झालो आहे. एकेक पाऊल पुढं टाकतो आहे..
***
निर्माणची पुढची बॅच येत्या जानेवारीमध्ये येथे सुरू होत आहे. यामध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल तर http://nirman.mkcl.org या संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज डाउनलोड करता येईल. अधिक माहितीही याच वेबसाइटवर उपलब्ध आहे.