नाटक का करावंसं वाटतं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 07:00 IST2019-03-14T07:00:00+5:302019-03-14T07:00:06+5:30
हॅँगरवरून एखादा शर्ट सरकून पडावा तसं कलाकारामधून पात्र निसटून जातं. जणू तासा-दीडतासासाठी भाडय़ानं दिलेली शरीराची खोली नीटनेटकी करून पात्र निघून जातं आणि पुन्हा आपण ‘आपण’ होतो. हजार हत्तींचं बळ असलेल्या पायांना अचानक गोळे येतात. उसनी दिलेली ऊर्जा रंगमंच पुन्हा घेऊन टाकतो.

नाटक का करावंसं वाटतं?
-प्राजक्त देखमुख
नाटक का करावंसं वाटतं, हे एखाद्या कवीला कविता ‘कसं सुचतं,’ असं विचारण्यासारखं अवघड आहे.
पण सगळ्यात जवळंच कारण शोधायला गेला की ऑस्कर वाइल्डचं एक वाक्य हमखास आठवतं. I regard the theatre as the greatest of all art forms, the most immediate way in which a human being can share with another the sense of what it is to be a human being.
नाटकातल्या जिवंत अनुभवाची तुलना कसाशीच करता येणार नाही. फार तर एखाद्या संगीताच्या कार्यक्रमातल्या एखाद्या आभाळाला भिडलेल्या तानेला किंवा भैरवीच्या काळजाल्या पिळ्याला ती सर आहे; पण पुन्हा हे दोन्ही घडतं रंगमंचावरच म्हणून रंगभूमीच्या जिवंतपणाला तोड नाही असं व्यापकपणे पहायला हवं. इतर माध्यमात ‘टेक-रिटेक’ची सोय आहे ती इथे नाही; हे वाक्य आपण सर्रास ऐकतो-ऐकवतो. पण त्या मिनिटाला उठलेला अंगावरचा शहारा खरा. हे कोणत्याच शब्दात सांगण्यासारखं नाही. विंग ते मंच यात फूटभर अंतरात आपला आवेश, आपलं सगळंच कसं आमूलाग्र बदलून जातं. खर्या आयुष्यात ज्या गोष्टींबद्दल आपण व्यक्तही होत नाही त्या गोष्टीचं तिथे स्वगत होतं. अशाच एका स्वगतातून हा सगळा आकृतिबंध मी बाहेरून आत पाहिला होता.
‘‘भीती हा मनुष्याचा स्थायिभाव आहे. ‘जपून जा पुढे खड्डा आहे’ आणि ‘जपून जा पुढे काहीतरी आहे’’.
यात ‘काहीतरी आहे’ या वाक्याला जी भीती वाटते ती अधिक असते. अज्ञाताची भीती केव्हाही अधिकच.
अज्ञात मग ते पुढे असलेलं वळण असो, पुढे असलेला खड्डा, अगदी मृत्यू असो किंवा रंगमंचावर उभं राहिल्यावर समोर दिसणारा गूढगर्भ अंधार असो.. अज्ञाताची भीती.
याच अज्ञाताला सामोरं जाण्याच बळं दिलं या रंगभूमीनं. तुम्ही आम्ही एक जगण्याची भूमिका ठरवतो आणि उद्या त्या भूमिकेशी काळा-स्थळा-परिस्थितीनुसार बदलसुद्धा करतो. पण रंगभूमीवर ज्या नावाचा रंग तुम्ही चेहर्यावर लावाल ते पात्न कसंही असो, पण त्या भूमिकेशी बेईमानी कधीच करत नाही. एकवेळ नट बदलेल पण ते पात्न त्याची भूमिका कधीच सोडत नाही. ते त्याच्या बदलेल्या मतांवर पण तितकंच ठाम असतं.
पहिली घंटा..
जशी गर्भार आईला पहिल्यांदा, अगदी पहिल्यांदा जाणवलेली अज्ञाताची हालचाल.
‘झाली? घंटा झाली? कितवी होती?’ घाबरून जायला होतं पण येणार्या क्षणांची उत्सुकता असते.
लहानपणी जादूचे खेळ बघायचो तेव्हा चक्रावून जायचो. जादूगाराचा हात आत्ता रिकामा होता, त्यानं एक कपडा ठेवला अगडम्बगडम् केलं आणि हातात पाखरू! त्यानंतर पुन्हा तसाच
चक्रावून गेलो ते इथंच.. या रंगमंचावर!
एक पडदा उलगडतो आणि रिकाम्या अवकाशात कधी भव्य राजवाडा दिसतो, कधी कुणाची झोपडी, कधी उजाड माळरान, कधी दर्याकिनारा.
तसं पाहिलं तर सगळं आहे तिथेच पण तरीही वेगळ्या जगातलं. अज्ञात पण हळूहळू आश्वासक.
दुसरी घंटा..
श्वासांची भरती-ओहोटी सुरू झालेली. जणू रंगमंच हा अथांग समुद्र आहे आणि विंग म्हणजे किनारा. आणि तिथे किनार्यावर उभे असलेले तुम्ही. कोणत्याही क्षणी त्या अफाट चैतन्यात देह झोकून देणार आहात. कोणत्याही क्षणी. अज्ञात पण हळूहळू हवेहवेसे.
तिसरी घंटा.
तळहातावर बहात्तर हुळहुळणारी फुलपाखरं घेऊन उभे असलेले तुम्ही. श्वास पूर्णपणे थांबलेला. विंगेतली धडधड रंगमंचावर जग्गजेत्तं अवसान घ्यायला लावते. आपण रंगमंचावर उभे राहातो. कुठल्यातरी कोपर्यातून एक तिरकस उजेड येतो. कंठातला आवंढा शब्द होतो, हाताची ओल मूठ होते, श्वासांची आंदोलनं पॉज होतात. आणि डोळ्यातली बाहुली नजर होते. अज्ञात पण हळूहळू सवयीचे.
शेकडो खुच्र्यावर बसलेले शेकडो लोकांचे हजारो हात लक्षावधी टाळ्यांचे मोहोळ उठवतात. पडदा बंद बंद होत जातो.
हॅँगरवरून एखादा शर्ट सरकून पडावा तसा कलाकारामधून पात्न निसटून जातं. जणू तासा-दीडतासासाठी भाडय़ानं दिलेली शरीराची खोली नीटनेटकी करून पात्र निघून जातं आणि पुन्हा आपण ‘आपण’ होतो. हजार हत्तींचं बळ असलेल्या पायांना अचानक गोळे येतात. उसनी दिलेली ऊर्जा रंगमंच पुन्हा घेऊन टाकतो.
पडदा बंद होण्याची सुरुवात होण्यापासून ते पडदा पूर्ण बंद होईर्पयतच्या क्षणापुरता. येणार्या शहार्यांसाठी, त्या अनुभूतीसाठी कित्येक जण पुन्हा पुन्हा हा सबंध जन्म खर्ची घालतात; पण पडदा बंद होत असताना मनाला रुखरुख नसते.
कर्म कसंही असलं तरी मृत्युक्षणी मनाची जी अवस्था असते, तेच पुढच्या जन्मात जगण्याचं सूत्र असतं.
आणि लोकांचे अभिनंदन, अश्रू, आनंद, शिव्या, कौतुकं झेलून सुखावलेले आपण आपले रंग उतरवतो. आणि जाता जाता पुन्हा एकदा पाय रिकाम्या रंगमंचाकडे वळतात. तेव्हा पडदा उघडा असतो, समोर रिकामं अवकाश.
तेव्हा स्वतर्च स्वतर्शी बोलू लागतो.
इथल्याही जगण्यासाठी एकमात्न नियम हाच आहे की एक दिवस तुम्हाला मरावं लागेल. प्रवेशाला एक्झीट तरी असते किंवा पडदा तरी..
खरं नाटक आणि खोटंनाटं जगण्याच्या या काळात, नाटकातला जिवंतपणा जवळचा आणि निरंतर वाटतो..
( लेखक सुप्रसिद्ध लेखक/दिग्दर्शक आहेत.)